संजय थोरात ः गोरक्षनाथ टेकडी येथे सामुदायिक सोहळा उत्साहात
मंचर- लोहार समाज हा दुर्लक्षित समाज असून, सरकारने या समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविणे गरजेचे आहे. पारंपरिक व्यवसाय आधुनिकतेमुळे संपुष्टात येऊ लागले आहे, त्यासाठी लोहार समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी मुलांचे उच्च शिक्षण होण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस संजय थोरात यांनी केले.
अवसरी फाटा – गोरक्षनाथ टेकडी कार्यालय (ता. आंबेगाव) येथे लोहार समाज संघातर्फे आयोजित सामुदायिक विवाहसोहळा उत्साहात पार पडला. साखरपुडा समारंभ झाल्यावर महिलांनी वधू-वरांना हळद लावली. यावेळी तरुणांनी, वरांनी ,पाहुण्यांनी वाद्यावर मनमुराद नाचून आनंद घेतला. विवाह सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी वधु-वरांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. आयोजकांच्या वतीने या सोहळ्यासाठी विशेष योगदान दिलेल्या मान्यवरांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, लोहार समाज संघाचे राज्य अध्यक्ष दिलीप थोरात, जिल्हा अध्यक्ष संदीप थोरात, संतोष हराळे, दशरथ पोपळघट यांसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर आणि लोहार समाजातील समाज बांधवांच्या साक्षीने व अक्षदारूपी शुभाशीर्वाद देऊन विवाह सोहळा पार पडला, माहिती संघाचे सचिव आबा लोखंडे यांनी दिली.