शेवगाव – विमा कंपन्या करोडो रुपयांचा नफा मिळवत असून सरकारी कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. सरकार बहिर झालं आहे. त्याला शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही, अशी टीका करून ठाकरे साहेब तुमच्या राज्यात चाललंय काय? असा प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी केला. जागर एफआरपीचा या अभियानांतर्गत खासदार शेट्टी आज शेवगाव मध्ये आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रवीकांत तुपकर, प्रकाश तात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे पाटील, सुनील लोंढे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, दादा पाचरणे, प्रवीण म्हस्के, दादा टाकळकर, तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, अशोक भोसले, संतोष गायकवाड, प्रशांत घुमरे, शहर अध्यक्ष भाऊ बैरागी, अमोल देवढे, संदीप मोटकर, नानासाहेब कातकडे, अंबादास कोरडे, मच्छिंद्र आर्ले, शर्वरी देशपांडे, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, दिव्यांग संघटनेचे चाॅंद शेख, प्रहारचे संदीप बामदळे, किसान सभेचे संजय नांगरे, उपस्थित होते.
सभेच्या नियोजित वेळेपेक्षा अडिच तास उशीरा येऊनही शेट्टी यांचे आगमन झाल्या नंतर उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांची शहरामधून सवाद्य मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत केले. शिवाजी चौकातील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदारांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात जाहीर सभा झाली. यावेळी तालुक्यातील विविध संघटनांनी शेट्टी यांचा सत्कार केला.
खा. शेट्टी यांनी विमा कंपन्या गब्बर झाल्या. शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नाही, महाविकास आघाडी सरकारने कान बंद केले आहेत, असे बहिरे सरकार आमच्या वाट्याला आले. म्हणून हे जागर एफ आर पी चा अभियान सुरू केले आहे. असे सांगून तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्या ऊसाला तीन हजार रुपये टन भाव देतो, अशी ग्वाही यावेळी दिली.
रवीकांत तुपकर म्हणाले, आता शेतकरी खवळला आहे, सरकारला शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी एकत्र या, एकतेचा संदेश सरकारला द्यायचा आहे, विजया दशमीच्या दिवशी एफ आर पी च्या मुद्यावर सरकारशी सिमोलंघन करायचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भराट यांनी केले.जिल्हाध्यक्ष लवांडे यांनी आभार मानले.