मंदार अनिल
संपूर्ण जगाच्या पाठीवर कोणत्याच देशात नाही इतके भूतो न् भविष्यति वाघांचे रुबाबदार साम्राज्य भारतात आहे. पंतप्रधान मोदींनी “नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन ऑथॉरिटी’चा व्याघ्रसंख्या अहवाल सादर केला. त्यानुसार एकट्या भारतात 80 टक्क्यांपेक्षा अधिक वाघ आहेत.
अन्नसाखळीमध्ये वाघ सर्वोच्च स्थानी आहे. पर्वत, शीतर्पणी वृक्षांचा प्रदेश, कोरडा वाळवंटी प्रदेश ते थेट सदाहरित वनांपर्यंत वाघांचा वावर आढळतो. त्यामुळे वातावरण कोणतेही असो त्याची सगळीकडे “राजा’ म्हणूनच वावरण्याची प्रवृत्ती मानवासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. 2010 मध्ये जागतिक महत्त्वाच्या नेत्यांनी 2022 पर्यंत वाघांची संख्या दुपटीने वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले होते.
जगातल्या 3,159 वाघांच्या संख्येपैकी एकट्या भारतात 75 ते 80 टक्के संख्या एकवटलेली आहे. त्याच्या छत्राखाली भारत सरकारचे बहुआयामी विविध प्रकल्प वाघांच्या संख्येत वाढ करण्यासाठी सुरू आहेत. उदाहरणार्थ, वाघांच्या क्षेत्राचा जोडणी कार्यक्रम, शक्य असल्यास व्याघ्र संरक्षण क्षेत्रातील गावांचे स्थलांतरण या प्रयत्नांमुळे 1973 पासून सातत्याने वाघांची वाढती संख्या आपण बघतच आहोत.
काय आहे एन.टी.सी.ए.?
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण हे राज्य वनखाते, काही एनजीओज् व भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने वाघांची स्थिती, भक्ष्य आणि त्यांचा वावर यावर 2006 पासून दर चार वर्षांनी एक राष्ट्रीय स्तरावर अहवाल सादर करते. भारतीय वन्यजीव संस्थेने तयार केलेल्या नियमांच्या अधीन राहून 2005मध्ये पंतप्रधानांनी “टायगर टास्क फोर्स’ची स्थापना केली होती. 2006 मध्ये पहिल्या गणनेचे सर्वेक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावर तज्ज्ञांनी “आययूसीएन’मार्फत केले होते. आतापर्यंत सादर झालेल्या अहवालाबाबत भारताच्या वन्यजीव आणि व्याघ्र धोरणात आमूलाग्र बदल केला गेला आहे. या अहवालानुसार खालील प्रमुख बदल सध्याच्या घडीला अस्तित्वात आहे.
1) वाघांच्या अधिवासाच्या संरक्षणाचे नियम. 2) वाघांसाठी मध्यवर्ती आणि केंद्रीय परिवहन क्षेत्राची निर्मिती. 3) नवीन व्याघ्र प्रकल्पांना मंजुरी. 4) भौगोलिक व्यवस्थेच्या मुद्देसूद अभ्यासानुसार वाघांच्या संरक्षणाचे प्रयत्न. 5) जनुकीय संतुलनासाठी भविष्याच्या दृष्टीने आखावयाची रणनीती केली जाणार आहे.
हा जगातला सर्वांत मोठा प्रकल्प आहे. 2018-19मध्ये केले गेलेले हे मूल्यांकन अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने केले आहे.विविध आधुनिक पद्धतीद्वारे एका वर्षापर्यंतच्या वाघांच्या बछड्यांचे मूल्यांकन याद्वारे केले गेले. उदाहरणार्थ, 2018 मध्ये 3 लाख 81 हजार 448 किलोमीटरचे सर्वेक्षण केले. ज्यात 26 हजार 838 कॅमेरे बसविले गेले. ज्याद्वारे वनविभागाला 1 लाख 21 हजार 347 किलोमीटरचा विस्तृत भूप्रदेश आपल्या नजरेखाली आणता आला. या सर्व उपायांतून सुमारे 3 कोटी छायाचित्र उपलब्ध झाले. अथक प्रयत्नांनी आणि भारतीय वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे हा अहवाल प्राप्त झाला आहे.
भारतात वाघांची संख्या बऱ्याच भागात सम आढळते तर, कुठे विषम आढळते. पण भौगोलिकरित्या प्रत्येक भाग ज्याच्या-त्याच्या वैशिष्ट्यांनीयुक्त असल्याने कोणत्याही भागाकडे कानाडोळा करता येत नाही. त्यानुसार भारतीय वाघांची शिवालीक, गंगा खोरे, मध्य भारत आणि पूर्व घाट, पश्चिम घाट, उत्तर-पूर्व डोंगररांगा, ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे आणि सुंदरबन या प्रमुख विभागात वर्गवारी केली जाते. या प्रत्येक विभागात स्वतंत्ररित्या सर्वेक्षण केले गेले.
एनटीसीएच्या अहवालानुसार 3 लाख 81 हजार चारशे वर्ग किलोमीटर भागाचे सर्वेक्षण वाघांच्या चिन्हांसाठी केले गेले. 26 हजार 838 कॅमेरा ट्रॅप 141 ठिकाणी लावले गेले. 5 लाख 22 हजार 996 किलोमीटरचा पायदळ सर्वेक्षण, 34 कोटी 85 लाख 8 हजार 623 या फोटोंपैकी 76 हजार 651 फोटो वाघांचे होते. 2018-19च्या व्याघ्रगणना नकाशाकडे जर बारीक लक्ष दिले तर आपल्याला असे लक्षात येते की, वाघांचे अस्तित्व मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा पूर्व भाग, कर्नाटक, केरळ, मध्य पश्चिम घाट, उत्तर प्रदेश मधला हिमालयाकडचा भाग, राजस्थानचा उत्तर भाग यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.
उपलब्ध आकडेवारीनुसार शिवालिक आणि गंगा खोऱ्यात वाघांची संख्या 2018-19 मध्ये 646 आहे, जी 2006 मध्ये 257 होती, मध्य भारतीय भूप्रदेश आणि पूर्व घाट यात 2018-19 मध्ये 1,033 वाघ आहेत जे 2006 मध्ये 601 होते, पश्चिम घाट रांगांमध्ये 2018-19 मध्ये 981 तर, 2006मध्ये 402 होते, उत्तर पूर्व डोंगररांगा आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात 219 वाघ आहेत जे 2006 मध्ये 100 होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुंदरबनमध्ये 88 वाघ आहेत. यावरून भारत सरकारतर्फे सातत्याने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना किती यश आले आहे हे दिसून येते. वाघांच्या संख्येत झालेली वाढ हे गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे फलित आहे. भारतीय वन्य विभाग जंगलातील वाघांच्या शाश्वत रक्षणासाठीच्या उपायांवर काटेकोरपणे लक्ष देत आहे. येणारे भविष्य वाघांच्या संख्येबाबत आणखीनच सुवर्णमय असेल हा दुर्दम्य आत्मविश्वास प्रत्येक भारतीयास येऊ शकतो.