मुंबई – देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. “माझी माती, माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र शासनाच्या “आझादी का अमृत महोत्सव’ सांगतेच्या निमित्ताने “मेरी माटी-मेरा देश’ अर्थात “माझी माती, माझा देश’अभियानांतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तूजतनाच्या विविध कामांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, महात्मा गांधींनी ब्रिटिशांना “चले जाव’चा नारा येथूनच दिला आणि तरुणांमध्ये चेतना जागविली. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखविली. अशा अगणीत हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप आपण “माझी माती, माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित अशा उपक्रमाने करत आहोत.
प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा वारसा आहे. त्यासोबत, संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारांची मोठी फळी या महाराष्ट्राने देशाला दिली. कष्टकरी, शेतकरी, कामगारांनीही मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे केवळ त्यांच्या बलिदानाचे स्मरण करुन नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, याच उद्देशाने हे अभियान देशभरात राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
9 ऑगस्ट हा स्वातंत्र्यसैनिकांना, शहिदांना नमन करण्याचा दिवस आहे. आपण या ठिकाणी शहिदांची आठवण करून, वृक्षारोपण करून, तिरंगा फडकवून आणि आपल्या मातीला नमन करून सुरुवात केली आहे. येत्या काळामध्ये या पंचप्रणच्या माध्यमातून निश्चितपणे आपण नागरिक म्हणून देशाला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण करु. या अभियानाच्या माध्यमातून गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे काम करु.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे लोकआंदोलन ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरु झाले. या स्वातंत्र्यसैनिकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी देशासाठी त्याग केला. ही देशभक्ती आणि विकासाची ज्योत तेवत राहील आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. देशाच्या प्रगतीत अनेकांचे योगदान आहे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री