पुणे –केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात “एमपीएससी’ने यापुढे सर्व भरती प्रक्रियेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भरतीप्रक्रियेत पदे अडविली जाण्याच्या प्रकारांना चाप बसणार असल्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या विविध भरती प्रक्रियांचे अंतिम निकाल जाहीर करण्याच्या प्रचलित कार्यपद्धतीवर विचार करून निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे परिपत्रक “एमपीएससी’ने प्रसिद्ध केले आहे.
यूपीएससीच्या धर्तीवर आता “एमपीएससी’कडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यात बहुसंवर्गीय पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्याद्वारे अंतिम शिफारस यादी करण्यात येणार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
दरम्यान, लेखी परीक्षा मुलाखतीतील गुणाबाबत माहिती नसल्याने उमेदवाराकडून सर्व पदांचे पसंतीक्रम दिले जातात. त्यामुळे पदे अडवली जातात. उदाहरणार्थ, सेवेत असलेल्या उमेदवाराची त्याच पदासाठी किंवा त्याच संवर्गातील पदासाठी निवड होते. मात्र, आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानंतर पसंतीक्रम मागवले जाणार असल्याने उमेदवाराला त्याच्या गुणांनुसार पसंतीक्रम देता येईल. त्यामुळे पदे अडवली जाण्याचे प्रकार थांबणार असल्याचे दिसून येत आहे.
लवकर निकाल जाहीर होण्यास मदत
आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार मुलाखती झाल्यावर शिफारसपात्र उमेदवारांची यादी तयार केली जाते. त्या प्रक्रियेत वेळ जात असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब होतो. मात्र, आता पदांचा पसंतीक्रम गुणवत्ता यादीनंतर घेतला जाणार असल्याने मुलाखतीचा टप्पा झाल्यावर या नव्या पद्धतीमुळे अंतिम निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.