नेवासा – नाशिक परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुर आला असुन तालुक्यातील जुने घोगरगाव, जुने जैनपुर गावातील 100 हून अधिक कुटुंबातील 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी याबाबत माहिती दिली.
रविवारी सायंकाळी गोदावरी नदित दोन लाख साठ हजार क्युसेसने विसर्ग वाढल्याने पूराची शक्यता लक्षात घेता तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या घोगरगाव 25 व जैनपुर येथील 75 कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर घोगरगाव शिवारातील महानुभाव आश्रमातूनही 45 जण बाहेर काढले आहे.
रविवारी दुपार पासुनच तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक रणजीत डेरे व पोलिस कर्मचारी बाळासाहेब कोळपे, तलाठी राहुल साठे तसेच जैनपुरचे सरपंच सुरेश डीके, उपसरपंच भाऊ घुगे, घोगरगावचे उपसरपंच राजेंद्र सपाते तळ ठोकून होते. या परिसरात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी सकाळी सुरक्षास्थळी हलवण्याचा निर्णय घेतला.
रात्री नऊ वाजेपर्यंत दोन्ही गावातील नागरिकांना व जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासनाने वाहनाची व्यवस्था केली होती. तसेच या पुरग्रस्त नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पुरग्रस्थांना गावातील जिल्हापरिषद शाळेत निवाऱ्याची सोय केली होती.