नवी दिल्ली – भारताचा डबल ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार (74 किलो) आणि ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक (62 किलो) यांना भारतीय कुस्ती महासंघाने वार्षिक करारातून वगळले आहे.
निराशाजनक आणि अपयशी कामगिरीमुळे या दोघांना करारातून मुक्त करण्यात आले आहे. त्याचवेळी युवा कुस्तीगीर अन्शु मलिक (57 किलो) आणि सोनम मलिक (62 किलो) यांना अ गटात नव्याने करारबद्ध करण्यात आले आहे.
महासंघाने नव्याने करार करताना खेळाडूंच्या कामगिरीचे मोजमाप केले आहे. त्यांनी किमान कामगिरी करणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेती पूजा धांडा (57 किलो, 59 किलो) आणि आशियाई ब्रॉंझपदक विजेती दिव्या कांक्रन (68 किलो) यांनाही करार नाकारण्यात आला आहे.
सुशील आणि साक्षी या दोघांनाही अ श्रेणीचा करार होता. त्यांना वार्षिक 30 लाख रुपये मिळत होते. त्याचा ते प्राशिक्षणासाठी वापर करू शकत होते. पण, गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी पाहता या दोन वरिष्ठ कुस्तीगिरांना वगळण्याचा निर्णय महासंघाने घेतला. त्यांच्या जागी मुलींमध्ये अन्शु आणि सोनम यांना करारबद्द करण्यात आले.
सुशील दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी झालेला नाही. राष्ट्रीय स्पर्धेतूनही त्याने माघार घेतली होती. साक्षी देखील रिओ ऑलिम्पिक पदकानंतर आपली कामगिरी दाखवू शकलेली नाही.