नीलकंठ मोहिते
इंदापूर – वीज वितरण कंपनीने इंदापूर तालुक्यातील सर्वच परिसरात भारनियमन सुरू केल्यामुळे, छोटे-मोठे व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. पूर्ण क्षमतेने वीज मिळत नसल्यामुळे, पाणी असतानाही पिके डोळ्यासमोर करपून चालली आहेत. ऊर्जा विभागाने अवेळी वीज सुरू करायची व शेतकऱ्यांचा अंत बघायचा, असा जीव घेणारा चटका तालुक्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना बसू लागला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने भारनियमन बंद करून, शेतकऱ्यांचा व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा विचार करावा. वीज पूर्ववत करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी नागरिक करीत आहेत.
सरकारने भारनियमन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, गावोगावी अधिक तापमान वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असून, घरातील वृद्ध तसेच लहान मुले यांना घरामध्ये रात्री-अपरात्री, दिवसा वीज नसल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहेत. तर छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे धंदे बंद पडू लागले आहेत. इंदापूर, बावडा, निमगाव केतकी, भिगवन अशा मोठ्या शहरात व गावात देखील दिवसभर तर काही रात्री भारनियमन सुरू असल्यामुळे या भागात विद्युत पुरवठा बंद राहत असल्यामुळे व्यवसायिक यांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत.
शेतकऱ्यांना दिवसभर शेतीमध्ये राब राब राबावे लागते. त्यातच दिवसभर भारनियमनाच्या नावाखाली वीज बंद असल्यामुळे शेतीतील पिकाला पाणी देता येत नाही. रात्रभर वीजेची वाट बघत आपले पीक जगवण्याची कसरत, शेतकऱ्यांच्या पदरात आलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारनियमनाचा फटका छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना नाहक सहन करावा लागत आहे. आपली शेतीपंपाची बिले भरणा करुण देखील वीजेचा भरोसा न सांगता येणारा आहे. वीजबिल भरण्यात विलंब झाला. जे शेतकरी वीजबिल भरतात त्यांनादेखील पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही.
भारनियमनाविरोधात आंदोलन उभारावे का?
ऊर्जा विभागाच्या मनमानीवर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना व अन्य मित्र पक्ष ब्र शब्द बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे गावागावातून, घराघरातून या विभागाच्या विरोधात आक्रोश निर्माण होऊ लागला आहे. मध्यंतरीच्या शेतकरी वर्गाची वीज तोडणी केली. त्यामुळे भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनाचा एल्गार राज्याला दाखवला. असेच आणखी मोठे आंदोलन वीज वितरण कंपनीच्या भारनियमन विरोधात उभारले जाईल. अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
उकाडा वाढला
एक तर भारनियमन असल्यामुळे घरातील वीज बंद, त्यातच अवकाळी पावसाचा शिडकावा पडला. त्यामुळे ग्रामीण भागातील गावागावात प्रचंड उकाडा वाढला आहे. याचा त्रास लहान बाळांना व वृद्ध लोकांना होत असल्यामुळे सामान्य कुटुंबातून भारनियमन मुळावर उठल्याची प्रतिक्रिया बाहेर पडत आहे.