इस्लामपूर – साखर कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी कर्जे घ्यावी लागत आहेत. केंद्र सरकारने या कर्जाच्या व्याजात सवलत देण्यापेक्षा साखरेला 35 रुपयांच्यावर दर देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा लागेल. कोल्हापूरमध्ये साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये जे ठरेल, त्याप्रमाणे आपणही करू, असा विश्वास आ. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील 51 व्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, झुंझारराव शिंदे, विजयभाऊ पाटील, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, विष्णूपंत शिंदे उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, गेल्यावर्षी एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना कर्जे घ्यावी लागली. दरवर्षी अशी कर्जे घेतल्यास साखर कारखान्यांवरचा कर्जाचा बोजा वाढत जावून बॅंका कर्जे देणे बंद करतील. त्यामुळे साखरेला चांगला दर देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरायला हवा. अतिवृष्टीने साखर कारखाने चालू करण्यास उशीर झाला आहे.
ऊस दराचा प्रश्न तातडीने मिटवून साखर कारखाने लवकर सुरू करायला हवेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र राज्यपालांनी जी मदत जाहीर केली आहे, ती फारच अपुरी आहे. आम्ही सत्तेत असो अथवा विरोधी बाकावर, मात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
पी. आर. पाटील म्हणाले, कारखान्याच्या 50 वर्षाचे सिंहावलोकन केले तर लोकनेते राजारामबापू पाटील यांनी आपला कारखाना उभा करताना जी स्वप्ने पाहिली, ती पूर्ण झाली आहेत. वाळवा तालुक्याच्या प्रगतीचा पाया स्व. बापू व आ. जयंतराव पाटील यांनी रचलेला आहे. केंद्र सरकारने 10 टक्के साखर उताऱ्यास 2750 एफआरपी केली. मात्र साखरेचे दर चांगले राखण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे कारखान्यांना एसआरपी देण्यास कर्जे काढावी लागली आहेत. केंद्र सरकारने 20:80 सूत्र स्वीकारायला हवे. आम्ही तिन्ही युनिटमध्ये 21 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार आहोत. सर्व घटकांनी सहकार्य करावे.
या समारंभास ऍड. चिमणभाऊ डांगे, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, भीमराव पाटील, संभाजी कचरे, नेताजीराव पाटील, दिलीपराव वग्यानी, संग्राम फडतरे, रवींद्र बर्डे, बी. के.पाटील, सुहास पाटील, शामराव पाटील, शामराव वाटेगावकर, बाळासाहेब पाटील, रणजित पाटील, संजय पाटील, छाया पाटील, सुस्मिता जाधव, एस. टी. माने, पै. हणमंतराव पाटील, आर.डी. सावंत, उपसभापती सुरेश गावडे, हरिदास पाटील, प्रा. बाळासो मासुले, खंडेराव जाधव, शहाजी पाटील, शंकरराव भोसले, तानाजी खराडे, आर. डी. माहुली, प्रतापराव पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले.