निवासी शाळेद्वारे “त्या’ मुलांना आकार देणाऱ्या रामेश्वरी जाधव यांचा थक्क करणारा प्रवास
मूकबधिर मुलांची जडणघडण करण्याचं आव्हान गरिबीमुळं पालकांना पेलणं अशक्य होतं. या मुलांचं जगणं सुसह्य करून ते आकाराला येण्यासाठी रामेश्वरी जाधव यांनी श्री यशोदीप कला क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून निवासी मूकबधिर विद्यालयाची बारामती तालुक्यात कऱ्हावागज या गावात स्थापना केली आहे. समाजसेवेचं “व्रत’ स्वीकारलेल्या रामेश्वरी जाधव यांच्याशी जागतिक महिला दिनानिमित्त दैनिक “प्रभात’ने साधलेला हा संवाद.
शिक्षण घेताघेताच माणसाची स्वप्नं आकाराला येतात, पण शिक्षण घेतल्यानंतर आणि तेही उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी करू.. चांगले पैसे कमवू… चांगलं राहू.. अशा भौतिक गोष्टींची ओढही माणसाला लागते, पण पुणे विद्यापीठातून हिंदी विषयात गोल्ड मेडल मिळवल्यानंतर तसंच वूमन स्टडीजमधून एम. ए. व पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर रामेश्वरी जाधव यांना स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टीनं चांगल्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी समाजातल्या दुर्लक्षित अशा घटकासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यातल्या सजग नागरिकाचं दर्शन घडवतो.
खरंतर या सगळ्याची सुरुवात झाली ती महाविद्यालयीन जीवनापासूनच. महाविद्यालयात असताना राष्ट्रीय सेवा योजनेशी नाळ जुळल्यामुळं समाजाकडे सजगपणे बघण्याचा त्यांचा एक दृष्टिकोन विकसित झाला. समाजसेवाच करायची, हे आधीपासूनच ठरलं होतं का? असं विचारलं असता रामेश्वरी जाधव अगदी ठामपणे उत्तर देतात, हो, समाजासाठी काम करायचं हे माझं सुरुवातीपासूनच ठरलं होतं, पण मूकबधिरांसाठी काम करायचं हे मात्र ठरलं नव्हतं. त्याचं असं झालं की एकदा एका समारंभाला मी गेले होते. तिथं मूकबधिर मुलाशी त्याची आई बोलत होती. या आईचा मुलाशी होत असलेला संवाद पाहून माझं मन हेलावलं. त्यांच्या नात्यांच्या मर्यादाही मला जाणवल्या. त्यातूनच या मुलांसाठी काहीतरी करावं, असं वाटलं आणि मग तेव्हापासून मूकबधिरांसाठी शाळा सुरू करायची, त्यांना आपल्या परीनं चांगलं आयुष्य त्यायोगे देण्याचा प्रयत्न करायचा, हेच ध्येय बनलं.
कामाची दिशा ठरल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात न करता खरंच आपण जे करू पाहतोय, त्याची समाजात गरज आहे का, असल्यास किती आहे, त्या प्रश्नाची सध्यस्थिती काय आहे याची पडताळणी करण्यासाठी बारामती तालुक्यात त्यांनी एक सर्व्हेक्षण केलं. 2010 मध्ये या सर्व्हेक्षणातून त्यांच्या लक्षात आलं की या भागातील मूकबधिर आणि मतिमंद मुलांसाठी निवासी शाळेची गरज आहे. काम तर करायचे होतेच, पण
सर्व्हेक्षणातून संबंधित प्रश्नाचे नेमके आकलन झाले. खरंतर या सर्व्हेक्षणाचा अहवाल शासनाला देऊन या क्षेत्रात कोणकोणत्या कामाची गरज आहे, ते कसं करता येईल, असं त्यांना सुचवता आलं असतं, पण त्याऐवजी रामेश्वरी यांनी ते आव्हान पेलायचं ठरवलं आणि त्यातूनच 2010 मध्ये निवासी मूकबधिर विद्यालयाची बारामती तालुक्यात कऱ्हावागज गावात स्थापना झाली. त्यानंतर रामेश्वरी यांनी मूकबधिर विषयात शिक्षण शास्त्राची पदवी घेतली.
पाठिंबा… घरच्यांचा आणि समाजाचा…
आपण जी काही स्वप्न पाहतो, त्यात घरच्यांची साथसोबत असेल, तर त्या स्वप्नांना आणखी बळ येतं. रामेश्वरी जाधव यांच्याबाबतीतही तसंच झालं. नितीन जाधव यांच्याशी लग्न झाल्यावर त्यांच्याकडून आणि सासरच्या मंडळींकडून सर्वतोपरी सहकार्य त्यांना मिळालं. त्यामुळंच पोटचे मूल अवघ्या सहा महिन्यांचे असताना त्यांनी निवासी मूकबधिर विद्यालयाची स्थापना केली. शाळेची स्थापना करताना खूप अडचणी समोर उभ्या होत्या, पण एकेका अडचणीवर मात करत काहीही झालं तरी मूकबधिर मुलांसाठी शाळा सुरू करायचीच, हे ध्येय त्यांनी मागे पडू दिलं नाही. काम सुरू करण्यासाठी जवळ पैसेही नव्हते, मग त्यांनी स्वतःचे दागिने मोडून ही शाळा सुरू केली. शाळा सुरू झाली तेव्हा एकच मुलगा आमच्याकडे होता.
लोकांना कळत गेलं तशी मुलांची संख्या वाढू लागली, पण या मुलांना शिकवण्यासाठी शाळेत शिक्षकांची नेमणूक करावी लागणार होती, पण जवळ पैसे नव्हते. तसंच मुलांसाठी लागणाऱ्या वस्तूंचीही कमतरता होती. मग घरोघरी जाऊन मुलांसाठी खेळणी, कपडे, असं जे काही देता येईल, ते द्यावे, असं आवाहन केलं. हे आवाहन घरोघरी जाऊन करायचे तेव्हा या प्रश्नाबद्दल लोकांना माहितीही द्यायचे. त्यामुळं त्यांच्यातही जनजागृती होत होती. लोकांना कामाचं महत्त्व पटल्यामुळं ते मला मदत करू लागले. मूकबधिर मुलांच्या पालकांकडून मी एकही रुपया फी आकारायची नाही, असं ठरवलं होतं. त्यामुळं जे काही काम उभं राहिलं ते खऱ्या अर्थानं समाजातूनच उभं राहिलं. मी फक्त त्या कामाची माध्यम ठरले इतकंच”
कामाची व्याप्ती वाढवली…
या शाळांना सहसा सरकारी अनुदान मिळत नाही. विनाअनुदानित स्वरूपाची शाळा असेल तर शिक्षकांना चांगले पगारही देता येत नाहीत. त्यामुळं चांगल्या पगाराची संधी आल्यास शिक्षक सोडून जात होते, पण तरीही रामेश्वरी यांनी आपला विश्वास ढळू दिला नाही. तसंच स्थलांतरित मजूर-कामगारांच्या मूकबधिर मुलांचे प्रश्नच वेगळे आहेत. त्यामुळं अशा गरजू मजुरांच्या मुलांना त्यांनी आपल्या शाळेत प्रवेश दिला. आज या विद्यालयात 35 मुलं सन्मानानं शिकत आहेत, हे विशेष!
न मागताही मिळत गेली मदत…
रामेश्वरी जाधव यांनी सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की, या कामासाठी कुणाकडेही थेट पैसे मागायचे नाहीत. समाजाला या कामाचं महत्त्व पटलं की तो आपोआप या कामाच्या मागे उभा राहील असा त्यांना विश्वास होता. झालंही तसंच. त्या भेटेल त्याला शाळेचं माहितीपत्रक देत असत. त्यात शाळेची माहिती आणि शाळेला एकदा तरी भेट देण्याचं त्या आवाहन करत असत. तसंच आपला एखादा भावनिक क्षण या मुलांसोबत घालवावा, असंही सुचवत असत. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी जेव्हा त्यांचं काम प्रत्यक्ष पाहिलं, तेव्हा सढळ हातानं मदत करायला सुरुवात केली. देणगीदारांना करसवलत मिळावी म्हणून “80 जी’ची तरतूदही त्यांनी करून घेतली. शाळेतल्या एका मुलाचा वार्षिक खर्च 16 हजार रुपये आहे. या खर्चात ज्यांना योगदान द्यायचं आहे, त्यांच्यासाठी त्यांनी विशेष योजनाही सुरू केली आहे. शाळेतल्या मुलांसाठी रामेश्वरी यांनी एक दिनचर्या आखली आहे. त्यात प्रार्थना, योगासने, प्राणायाम यांचा समावेश आहे. तसंच या मुलांना सहज खेळता येतील असे विशेष खेळ, विविध कौशल्यांचं प्रशिक्षणही त्या शाळेत देत असतात. या मुलांच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच माझ्या कामाची पावती असते, असं रामेश्वरी आवर्जून सांगतात. दिव्यांगांसाठी उभारलेलं हे “घरकुल’ त्यांना घराची माया आणि छाया देण्यासाठी कटिबद्ध आहे.
आगामी प्रकल्प
पालक समुपदेशन केंद्र आणि मूकबधिरांसाठी वधू-वर सूचक केंद्र मूकबधिर मुलांच्या पालकांना मार्गदर्शन मिळावं यासाठी लवकरच एक समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा रामेश्वरी जाधव यांचा मानस आहे. तसंच मूकबधिरांसाठी स्वतंत्र वधू-वर सूचक केंद्र सुरू करण्याचं नियोजन पूर्ण झालं असून हा प्रकल्पही अल्पावधित पूर्ण करण्यात येणार आहे. शाळेबरोबरच विविध समित्यांवरही त्यांची निवड झालेली आहे. विविध शाळांच्या महिला दक्षता कमिटीशी त्या संलग्न असून विविध संस्थांशीही त्या जोडलेल्या आहेत. आगामी काळात मूकबधिर व दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्प केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अस्तित्वात येणार आहे. रामेश्वरी यांनी त्या दिशेने पावले उचलली असून कंपनीच्या निर्मितीस प्रारंभ देखील केला आहे.
शाळेची वैशिष्ट्ये :-
मूकबधिर मुलांसाठी बारामती तालुक्यातील पहिली निवासी शाळा.
पूर्णपणे मोफत शाळा.
शाळेत अत्यंत गरीब कुटुंबातील आणि मजुरांच्या मुलांची संख्या जास्त.
हसत-खेळत शिक्षणावर भर.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
शालेय शिक्षणाबरोबरच अंगभूत कौशल्य विकसित करण्यावर भर.
सामाजिक व वैचारिक प्रबोधनावर भर
सुरू असलेले प्रकल्प.
प्रौढ मूकबधिर मुला-मुलींना व्यावसायिक शिक्षण देणे.
संगणक प्रशिक्षण, शिवणकाम, फाइल मेकिंग, हस्तकला अशा विविध व्यवसायांचं प्रशिक्षण दिले जात आहे.
अपंग व मूकबधिर मुलांसाठी स्कूलबसची आणि मोफत क्लिनिकची सोय.
श्रवणयंत्र, उच्चार व उपचारपद्धती यासाठी मागर्दर्शन व सल्ला केंद्र.
कामात सहभागी व्हायचंय?
एका मुलाचा वार्षिक 16 हजार रुपये खर्च देऊ शकता.
मुलांना लागणारं अन्नधान्य, कपडे किंवा अन्य आवश्यक वस्तू देऊ शकता.
स्वतःचा / आई-वडिलांचा / मित्रमंडळींचा वाढदिवस मुलांसोबत साजरा करू शकता.
मुलांसाठी वर्षातून एकदा सहलीचे आयोजन करू शकता.
देणगी देण्यासाठी…
श्री यशोदीप कला क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, आयसीआयसी बॅंक
खाते नाव : यशोदीप कला क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ
शाखा – बारामती, जि. पुणे
खातेक्रमांक – 645201052579
IFSC Code – 645201052579
Pan No. – AAATY2757L
संकलन : प्रमोद ठोंबरे, बारामती (तालुका प्रतिनिधी)