मुंबई – दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला तीन वर्ष उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणाबाबत ठोस पुरावे सापडलेले नाही. त्यामुळे त्याची हत्या होती की आत्महत्या हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला तरीही त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सुरुवातीला या प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे नव्हते. उपलब्ध माहिती ऐकीव माहितीवर आधारित होती, नंतर काही लोकांनी ठामपणे सांगितलं की त्यांच्याकडे खटल्याच्या संदर्भात ठोस पुरावे आहेत. त्यानंतर त्या लोकांशी संपर्क साधण्यात आला आणि पोलिसांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले. सादर केलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता अधिकारी तपास करत आहेत. ते पुरावे विश्वासार्ह असतील तर त्याच्या आधारे नक्कीच कारवाई केली जाईल.”
परंतु सध्या या प्रकरणावर कोणतंही भाष्य करणं घाईचं ठरेल, योग्य वेळ आल्यावर त्यासंदर्भात बोलेन, असेही यावेळी फडणवीस म्हणाले. दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जुन २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरा आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलिस सीबीआय आणि एनसीबी यांनी या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची कसून चौकशी करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. मात्र तिची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.