अरुण गोखले
आषाढ महिन्यातला मराठी पंचांगातील शेवटचा दिवस म्हणजे आषाढ आमावस्या. यालाच “दिव्याची अवस’ असेही म्हणतात. या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरात देवघरातील समया, दिवे इतर साहित्य घासून पुसून स्वच्छ करायची असतात. काही घरांमध्ये तर या दिवशी कणकेची दिवे तयार करून त्यात तेलवात करून तिन्ही सांजेच्या वेळी त्या दिव्यांचे प्रज्वलन करून त्या दीपाकडे अशी प्रार्थना करायची असते की-
शुुभं करोति कल्याणम्। आरोग्यम् धन संपदा।
शत्रुबुद्धी विनाशाय। दीपोज्योति नमोस्तुते।।
या दीपज्योतीकडे पूर्वापार करीत आलेल्या मागणीचा नेमला अर्थ असा आहे की “हे दीपज्योती! तू आमचे शुभ म्हणजे सदैव भले आणि चांगले कर. आम्हाला आमच्या जीवनात उत्तम आरोग्यरूपी धन संपदा लाभू दे. आमच्या मनातील राग, लोभ, मोह, मत्सर, द्वेष आणि अहंकार या सारखा शत्रूंचे तू ज्ञानरूपी शस्त्राने नाश कर. ह्यासाठी हे दीपज्योती आम्ही तुला वारंवार विनम्रभावाने नमस्कार करतो’
अशी प्रार्थना करून आजही काही घरांमध्ये दिव्याच्या अवसेची कहाणीही आवर्जून वाचली जाते.
या बाह्य दीप प्रज्वलना बरोबरच प्रत्येकाने या चातुर्मासाच्या निमित्ताने आपल्या अंत:करणात एक शुद्ध भक्तीचा, निर्मळ भावाचा, प्रभू प्रेमाचा ज्ञानदीपही लावायचा असतो. या ज्ञानदीपाकडे आपल्या जीवनातील दु:ख, दारिद्य्र, नैराश्य, अपयश, अज्ञान अशा विविध रुपातला अंधार दूर करण्याची प्रार्थना करायची असते.
आपल्याला आपले सांसारिक लौकिक जीवन हे सुखा समाधानाने जगता यावे. आपल्या आवश्यक त्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण व्हायला आपल्याला आवश्यक असणारी धनसंपदा, सौख्य आणि शांती प्राप्त व्हावी, अशी या दीपराजाकडे प्रार्थना करायची असते.
त्याप्रमाणेच बहुभाग्याने प्राप्त झालेल्या या जन्माची सार्थता साधून घेण्यासाठी सदैव ज्ञानाचा प्रकाश देत जो आपली उपासनेची, साधनेची, वाट आपल्याला पुढे दाखवित राहील, अशा सद्गुरू कृपादीपाचाही लाभ आपल्याला व्हावी, अशी जीवोद्धारक मागणी ह्या दीपाकडे करायची असते.
देवघरात आणि अंत:करणात लावलेल्या या दिव्यात श्रद्धा, भक्तीचे तेल सतत घालून ती ज्ञानाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवायची असते. तसे केले तरचं लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रांतात आपल्याला सुखाची दिवाळी अनुभवता येते.