अर्थव्यवस्था कमकुवत; परदेशातून नकारात्मक संकेत
मुंबई – अर्थव्यवस्था कमकुवत असूनही निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. त्यातच जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत आल्यानंतर शुक्रवारी भारतीय शेअरबाजारात जोरदार विक्री होऊन निर्देशांक घसरले.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 633 अंकांनी म्हणजे 1.63 टक्क्यांनी कमी होऊन 38,357 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 193 अंकांनी कमी होऊन 11,333 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स एचडीएफसी इन्फोसिस या बड्या कंपन्यांच्या शेअरची जास्त विक्री झाल्यामुळे निर्देशांकावर दबाव आला त्याचबरोबर ऍक्सिस बॅंक, टाटा स्टील, स्टेट बॅंक, एअरटेल, एनटीपीसी, आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरची जोरदार विक्री झाली. अशा परिस्थितीतही मारुतीच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
भारतातील विकासदर उणे 23.9 टक्के मोजला गेला आहे. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढली असली तरी सेवा क्षेत्राची उत्पादकता आणखी वाढलेली नाही. जीएसटीचे संकलन कमी झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. त्यातच चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. असे असतानाच अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी कमकुवत होण्याच्या शक्यतेमुळे अमेरिकेच्या शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळले. त्यानंतर आशियाई शेअरबाजाराचे निर्देशांकही कमी झाले. त्यामुळे भारतीय शेअरबाजारातील गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे दिसून येते, असे कोटक सिक्युरिटी या संस्थेचे उपाध्यक्ष संजीव झारबडे यांनी सांगितले.
मुळातच शेअरबाजार
निर्देशांक सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आगामी काळात अतिशय सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.
चीनचा बाजार भारतापेक्षा 5 पट मोठा
मे 2006 मध्ये भारताची परिस्थिती बळकट होती. त्यावेळी शेअरबाजारावर नोंदलेल्या भारतीय कंपन्यांचे बाजार मूल्य 745 अब्ज डॉलर होते. तर चीनच्या शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य केवळ 407 अब्ज डॉलर म्हणजे 50 टक्क्यांनी कमी होते. मात्र, आता चीनच्या शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य 10 लाख कोटी डॉलर आहे. तर भारतीय शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य जवळपास 2 लाख कोटी डॉलर आहे.