मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीर सोबत केल्यानंतर तिच्यावर राजकीय नेत्यांसह सर्वच क्षेत्रातील अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. मात्र आता कंगनाच्या पाठिशीही काहीजण ठामपणे उभे राहत आहेत. अमृता फडणवीस यांनी देखील कंगनाची बाजू घेत तिच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे.
एखाद्याच्या म्हणण्याशी आपण सहमत नसू, मात्र लोकशाही व्यक्त होण्याचा, मत मांडण्याच्या अधिकाराचे आपण रक्षण केले पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, पत्रकारितेचे स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्याच्या मताचा आपण प्रतिवाद करुन शकतो, मात्र टीकाकारांच्या पोस्टर्सना चप्पल मारणे खालच्या पातळीचे लक्षण आहे, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी कंगना रणौतला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असे सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचे तिने सांगितले. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असे वक्तव्य केले.