संगमनेर (प्रतिनिधी) – शहरात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर शिवाजीनगर परिसरातील तसेच शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून अनेक घरांमध्ये पाणी शिरले. संगमनेर नगरपालिकेने पावसाळी वाहिन्या, नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून शहराच्या उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पावसाळी वाहिन्या, नाले तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर शिवाजीनगर परिसर, स्टेडियम परिसर तसेच अनेक उपनगरांमधील अनेक घरांत आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.
काही घरांमध्ये अक्षरशः गुडघ्याइतके पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांना रात्रभर घरात घुसलेले पाणी उपसावे लागले. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली होती. याशिवाय अनेक चौकादरम्यानच्या रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे या बाजूच्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. दरम्यान, या भागात नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित झाली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात आमच्या घरात पाणी शिरते. सदर गटार ही अरुंद असूून तिची खोली कमी आहे. त्यामुळे थोडा पाऊस झाला तरी त्यातून पाणी बाहेर पडून आमच्या घरात घुसते. नेहमीप्रमाणे ते फक्त आश्वासने देतात. शहरातील गटारी स्वच्छ करून येथील गटारीची रुंदी वाढवावी
शंकर गायकवाड ,शिवाजीनगर, वैदवाडी