पिंपरी, दि. 19 – जीवनावश्यक घटक असलेल्या पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्यातच नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अपयशी ठरत आहे. पाण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना वणवण भटकावे लागत आहे.
जिल्हा रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. या सुसज्ज इमारतीमध्ये सुविधा देखील तितक्याच चांगल्या असतील असा भ्रम बाहेरून पाहणाऱ्यांना होईल. मात्र प्रत्यक्ष उपचारासाठी गेल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना आलेले अनुभव त्रासदायक आहेत. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात पिण्याचे पाणी मिळत नसून रुग्णालयातील थंड पाण्याच्या मशीलमध्ये पाणीच भरले जात नाही. रुग्णालय प्रशासनाकडून बाहेरून पाणी मागविले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाणी मागविणेच बंद करण्यात आले आहे.
रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना जेवण केल्यानंतर पाणीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक नातेवाईक पाणी आणण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर जात आहेत. मात्र रुग्णालयाच्या आजूबाजूला एकही हॉटेल अथवा पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे नवी सांगवी बाजारात जाऊन पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. पाण्यासाठी होणाऱ्या या ससेहोलपटमुळे रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. रुग्णांकडे पहायचे की पाण्यासाठी भटकायचे असा संतप्त सवाल ते उपस्थित करत आहेत. रुग्णालयीन प्रशासन देखील या बाबत मौनच धारण करून आहे.
जेवण केल्यानंतर पाणी पिण्यासाठी बाहेर आलो. मात्र रुग्णालयाच्या परिसरात कुठेही पाणी मिळाले नाही. त्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर गेलो. तिथेही जवळपास पाणी मिळाले नाही. सांगवी गावात जाऊन पाणी घेऊन आलो. रुग्णालयातच पाण्याची सुविधा द्यायला हवी.
– तुषार कापरे, रुग्णाचे नातेवाईक.