उर्वरित कार्यवाही लवकर पूर्ण होईल : जिल्हाधिकारी राम यांची माहिती
पुणे – शहरासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तत्काळ करण्याचे काम हाती घेतले असून, आतापर्यंत शहर आणि जिल्ह्यात एकूण 2 हजार 807 पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण होतील. तसेच आतापर्यंत झालेल्या पंचानामाच्या सहाय्याने नुकसानीची माहिती घेऊन पीडित कुटुंबांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मदत दिली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आढावा घेऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिल्यावर जिल्ह्यात 4 व्यक्तींचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक 50 कुटुंबासाठी एक पथक अशा प्रकारे ही पथके कार्यरत असून, शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत तीन पथकांनी 2 हजार 807 पंचनामे तयार केले आहेत. त्यामध्ये शहरात 1 हजार 479 पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, शुक्रवारी (दि. 27) 1 हजार 79 आणि शनिवारी (दि. 28) 40 पंचनामे पूर्ण करण्यात आले. तसेच हवेली (शहर) 775, हवेली (ग्रामीण) 488 आणि पुरंदर 65 पंचनामे पूर्ण झाले आहेत. अतिवृष्टीने बाधित झालेल्या कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाच्या वतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. पूरग्रस्थांना तातडीने 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.