आपल्या आयुष्यातील गेलेल्या क्षणांना आपण कितीही ठरवलं तरीही विसरू शकत नाही. त्या गतकाळातील आठवणींचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीवेळा नवी उभारी देत असतो, तर काहीवेळा नैराश्यात देखील घेऊन जात असतो. भूतकाळात घडलेल्या प्रत्येक घटनेचा, घडामोडीचा संबंध आपण आपल्या वर्तमानातील जीवनाशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न नेहमीच करत असतो. जो गेला तो भूतकाळ होता, त्यात किती गुरफटून राहायचं, ह्याचं कित्येकवेळा आपल्याला भानच राहत नाही. तो काळ आपण कितीही ठरवला, तरीही विसरूच शकत नाही. खरं म्हणजे भूतकाळात रममाण होण्यापेक्षा वर्तमानातील परिस्थितीनुसार भविष्य उज्ज्वल करण्याचा आपण प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं विचार केला पाहिजे. आपण अनेकदा भूतकाळातून अंतर्मनानं बाहेर पडत नाही आणि वर्तमानातील आनंद मिळवू शकत नाही, केवळ आपल्या नशिबाला आणि भविष्याला दोष देत बसतो.
आपल्या आयुष्यात अथवा इतरत्र काय घडलंय, हे आपल्याला माहिती असतंच किंवा ते कालांतरानं माहिती होतंच. कालची, भूतकाळातील माहिती आपल्या सर्वांनाच उपलब्ध होत असते. वर्तमानात राहून भूतकाळातल्या अनुभवांबरोबर सतत राहणं हे नेहमीच उपयोगाचं ठरतं असं नाही. प्राप्त परिस्थितीत काहीवेळा उपलब्ध झालेल्या अनेक चांगल्या संधी आपण गमावू शकतो. ह्याचं नुसतं ज्ञान असून चालत नाही, तर त्या संधीचं सोनं करण्याचं भान आपल्याला असणं आवश्यक असतं. अनेकदा आपल्या गत आयुष्यातील अनेक बाबींची सांगड, बरोबरी, तुलना आपण प्राप्त आणि सद्य:स्थितीशी करत असतो. काहीवेळा नकारात्मक विचार आपल्या अंतर्मनात थैमान घालायला लागतात आणि भ्रमातले आपण संभ्रमात जखडून राहतो. चांगलं-वाईट, चूक-बरोबर, खरं-खोटं अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावत राहतात. अशावेळी, आनंद तर नाहीच पण दु:ख, निराशा पदरी येते. मग आपण दोष मात्र आपल्या नशिबाला नाहीतर परमेश्वरालाच देत राहतो. आपल्यामध्ये काही उणिवा आहेत हे आपण मान्यच करायला तयार नसतो. अनेकदा नकारात्मक विचारच आपलं नुकसान करतात.
उणिवा
दैनंदिन आयुष्यात स्वतःच्या अशा कितीतरी प्रकारच्या, आपलं जीवन जगण्याच्या, नवनवीन कल्पना आपल्या मनात असतात. प्रत्येकालाच असं वाटत असतं की, आपलं आयुष्य इतरांपेक्षा निराळं असावं. जगानं कौतुक करावं असंच आपलं जीवन असावं, आपल्या प्रत्येक बाबतीत काही-ना-काही वेगळेपण असावं. इतरांपेक्षा मी आणि माझी प्रत्येक गोष्ट भिन्न असण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. त्यासाठी बदलत चाललेल्या जीवनमूल्यांचा स्वीकार करावा लागतो. आपल्यापैकी अनेकांना त्यांच्यात असलेल्या उणिवांच्या जाणिवाच होत नाहीत. खरं तर, आपल्यातील उणिवा दूर करून जाणिवा जपण्याची जरुरी असते आणि जपलेल्या जाणिवांना नेणिवेपर्यंत घेऊन जाण्याची जरुरी असते, हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. अनेकजणांना आपल्यांत उणिवा आहेत हे जाणूनच घ्यायचं नसतं, मान्य नसतं.
आपण वर्तमानात आपलं जीवन जगत असताना खरं तर सद्य:स्थितीचा, नजीकच्या भविष्यकाळाचा विचार करणं आवश्यक असतं. आपण वर्तमानातील जीवन जगताना प्राप्त परिस्थितीचा आनंद लुटण्याच्या ऐवजी भूतकाळाचे गोडवे गात बसतो. मी असं केलं होतं, तसं केलं होतं. त्या भूतकाळातल्या घटनांचं आपण सदोदित कौतुक करत राहत असतो. भूतकाळाचं भूतच जणू काही आपल्या मनाचा ताबा घेऊन सर्वत्र टेंभा मिरवत असतं. वर्तमानातल्या “मी’ चा त्यामुळेच आपल्याला विसर पडलेला असतो. मागील काळात, गत आयुष्यात, भूतकाळात मी कधी, कसा, कोण, कोठे आणि काय होतो, ह्यापेक्षा सद्य:स्थितीत, वर्तमानकाळात, आज मी कसा, कोण, कोठे आणि काय आहे? आणि ते सुद्धा का? (कोणत्या कारणाने?) ह्याचा प्रकर्षानं, प्राधान्यानं, सातत्यानं आणि साकल्यानं अभ्यासपूर्वक विचार करत राहणं गरजेचं असतं.
जाणिवा
मानसिक स्वास्थ्य टिकवल्यावर आपल्या अंतरंगात प्रसूत होणारा आनंद निरंतर राहतो. अर्थात, प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असते. खरं तर, आपापल्या अनुभूती आणि प्रचीतीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो. आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहारावर तो निर्माण कसा, किती आणि कधी होतो? ते अवलंबून असतं. अनेकदा आपल्या अंतर्मनातील विचारांमध्ये आपण गुरफटले जात असतो, अगदी न कळत होत असतं तसं. दिवसभरात हजारो विचार आपल्या अंतर्मनात निर्माण होत असल्याचं विज्ञानाच्या प्रयोगांतून स्पष्ट झालं आहे. त्या विचारांना विशिष्ट दिशा, गती अथवा विषय असतीलच असं नाही. दिवसभरात आपल्या मनात आलेले सर्वच विचार, तसं बघितलं तर, आपल्या लक्षात देखील राहतातच असं नाही. ह्या जगात विचार नाहीत असा प्राणी नाही. अनेकदा आपल्या विचारांचा संबंध सभोवताली घडत असलेल्या घटनांशी असतो. हे विचार कधी व्यक्तिगत तर कधी इतरांशी संबंधित असतात. अनेकदा इतरांच्या उणिवा शोधणारे विचारच त्यात अधिक असल्याचं दिसून येतं.
आकर्षणाचा सिद्धांत
जसं भूतकाळाचं भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं असतं, तसंच काहीसं भविष्यातील विचाररूपी राक्षसदेखील हात धुवून आपल्या मागे लागलेला असतो. अनेकदा भूतकाळातल्या आठवणी आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत, त्याचप्रमाणे भविष्याची चिंता, काळजी आपल्याला काही सुचू देत नाही. कितीही ठरवलं, काहीही केलं, तरीही आपण मात्र ह्याच दुष्टचक्रात अडकतो. गेलेला काल आपल्याला विसरणंच संयुक्तिक ठरतं आणि येणाऱ्या उद्याच्या चिंतेत व्यथित न होता आजचा वर्तमानातला दिवस आनंदात व्यतीत करणं अधिक महत्त्वाचं, आवश्यक, जरुरीचं आणि गरजेचं असतं. गेलेला काल आपल्या हातातून निसटून गेलेला असतो आणि उद्याची प्रत्येक घडामोड ही येणारा काळ ठरवतो.
अर्थात, उद्याचा येणारा प्रत्येक क्षण विलक्षण कसा करता येईल, त्याची सुरुवातच सकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहारानं कशी होईल, हे आपण अभ्यासपूर्ण वैचारिक मंथनातून ठरवू शकतो, त्यानुरूप कार्यकृती करू शकतो. ह्या ठिकाणी आकर्षणाचा सिद्धांत (लॉ ऑफ ऍट्रॅक्शन) ह्यामुळे सिद्ध आणि स्पष्ट झालेल्या शास्त्रीय प्रयोगाचा वापर उपयुक्त ठरू शकतो. थोडक्यात, आपल्या आंतरिक इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपली कार्यसिद्धी करू शकतो, त्यात भरघोस यशही संपादन करू शकतो, अशा दृष्टीकोनातून आकर्षणाचा सिद्धांत आपल्या सुखी, आनंदी आणि मन:शांती देऊ करणाऱ्या उद्यासाठी आपण आजपासून रोजच वापरू शकतो. आपल्या भविष्यातील योग हे नशिबावर नाही तर आपल्या विचार, वर्तन, व्यवहार ह्यावर अवलंबून, आधारलेले असतात ह्याची जाणीव होणं आवश्यक असतं.
जाणिवांची गरज आणि महत्त्व
महानगरांचा चौफेर होत जाणारा विकास, औद्योगिकीकरण, वाढत चाललेली लोकसंख्या, वाहतूक समस्या, मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाचा तसंच जीवनावश्यक गरजांचा समतोल राखणं अनेक ठिकाणी शक्य होत नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे वीज, पाणी पुरवठा, रस्ते, निवासव्यवस्था, शुद्ध हवा ह्या सर्वांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होत असल्याचं अनेकदा स्पष्ट होत असतं. महानगरांमध्ये अनेक ठिकाणी उभ्या होत असलेल्या टोलेजंग इमारती, मोकळ्या जागांचा, बागांचा, क्रीडांगणांचा अभाव तसंच वीज, पाणी, निवासव्यवस्था, शुद्ध हवा अशा अनेक मूलभूत गरजांवर मर्यादा येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत असतं. वाढत जाणाऱ्या लोकसंख्येबरोबर मूलभूत गरजा देखील वाढत जातात. त्याचा ताण शासकीय व्यवस्थेवर येतो. पाण्याचा वापर जसा वाढत असतो, तसाच त्याच्या वापरामुळे सांडपाणी आणि मैला-पाणी वाहून नेण्याची व्यवस्था देखील वाढवावी लागते.
पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी, पंपाची व्यवस्था करता येते, मात्र तयार होणारं सांडपाणी शहराच्या मैला-पाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेत सोडावं लागतं. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. हल्ली नव्यानं बांधल्या जात असलेल्या निवासी संकुलात कचरा संकलन करून त्याद्वारे खत निर्मिती आणि निर्मूलन करणं अनिवार्य झालं आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्याची जाणीव आपल्याला होणं, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून पर्यावरण पूरक घर बांधणी, वृक्षारोपण, प्रदूषण टाळण्यासाठी प्लॅस्टिक बंदी ह्या सर्वच बाबींचा गांभीर्यानं विचार करण्याची नितांत गरज आहे, तशी जाणीव होण्याची आवश्यकता आहे. काहीवेळा ह्या जाणिवांचीच उणीव असल्याचं खेदजनक चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. जगण्यापलीकडील जीवनाचा आनंद घेण्यासाठी, सद्य:स्थितीतील समस्यांपेक्षाही गंभीर समस्यांना सामोरं जाणं किती भयानक असू शकतं, ह्याची जाणीव न होणं हीच उणीव आहे.
उणिवांची जाणीव
कालचा दिवस संपल्यावरच आपल्या आयुष्यातील नवीन दिवसाची पहाट उगवते. दिवसाची सुरुवातच सकारात्मक विचारांनी झाली, तर नंतरचा दिवस उजाडेपर्यंत आपण आनंदी, सुखी, समाधानी तर राहू शकतोच, पण शिवाय मन:शांती अधिक प्राप्त होत राहते. आजचा दिवस माझा हेच सत्य आहे आणि म्हणूनच ते सिद्धही केलं पाहिजे. आपल्याला आपण स्वतः प्रसिद्ध होण्याची इर्षा असते आणि ती असलीच पाहिजे, पण प्रसिद्ध होण्यासाठी अगोदर स्वतःला सिद्ध करण्याची जरुरी असते, हे मात्र आपण विसरतो. केवळ विचारात, स्वप्नात, भ्रमात आणि संभ्रमात न अडकून पडता कार्यकक्षांच्या मर्यादा ओलांडाव्या लागतात, स्वतःला झोकून देऊन प्रत्यक्ष कार्यकृती करावी लागते, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे.
आपल्यापैकी प्रत्येकात काही उणिवा असतातच, उणिवा नसणारी व्यक्ती सापडणे सद्य:स्थितीत विरळाच; कालच्या काही उणिवा कुरवाळत बसण्यात आपण धन्यता मानतो, सतत उणिवांचीच, समस्यांचीच, द:खाचीच सर्वत्र आणि सातत्यानं आपण चर्चा करत राहतो. आजच्या आपल्या आणि इतरांच्या जाणिवा जपण्याच्या दृष्टिकोनातून आपण खरंच गांभीर्यानं विचार करतो का? आपल्या बुद्धिवादी जीवाला कालच्या उणिवा दूर करून, आजच्या जाणिवा जपून त्यांना नेणिवेपर्यंत नेण्याची आज खरी गरज आहे.
प्रा. शैलेश कुलकर्णी