मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. सीमाप्रश्नाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र- कर्नाटक बस सेवा तात्पुरत्या स्वरुपासाठी बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याच्या घडीला भाषिक वाद पेटला असून खबरदारीच्या उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूरहून कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना काहीकाळ त्रास सहन करावा लागणार आहे. बेळगावमध्ये भाषिक मुद्यावरुन वातावरण तापले असून त्याचा फटका बस सेवेला बसून नये, यासाठी बस सेवा बंद करण्यात आली आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याची मागणी करणाऱ्या कन्नड संघटनेच्या म्होरक्याबरोबर अज्ञात समाजकंटकांनी मराठी फलक टार्गेट केल्याचे समोर आले होते. शहापूर बसवान गल्लीत एका चहाच्या दुकानावरील मराठी फलकावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले होते.
महापालिकेने त्रीभाषा धोरणाचा अवलंब केला आहे. त्यामुळे मराठीसह कन्नड व इतर भाषांचाही वापर करता येतो; पण मराठीचे प्राबल्य काही मराठीद्वेष्ट्यांना खटकत असून त्याच असुयेतून काहींनी शुक्रवारी अंधाराचा फायदा घेत मराठी फलकावर दगडफेक करण्यात आली होती.
गेल्या काही महिन्यांपासून कन्नड फलकांची मागणी करत काही कन्नड कार्यकर्ते मराठी दुकानदारांना धमकावत असल्याचे प्रकार घडत होते. सीमाप्रश्नावरुन महाराष्ट्रात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर बेळगावातील कन्नड संघटनेतील कार्यकर्त्यांकडून हालचाली होताना पाहायला मिळत आहे. जर मराठी फलकांना टार्गेट करून नुकसान केले जात असेल चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा मराठी कार्यकर्त्यांनी दिला आहे.