रावणगाव – नंदादेवी (ता. दौंड) येथील ओढ्यावरील जलसंधारण योजनेअंतर्गत बांधलेला सिमेंटी बंधारा अज्ञात व्यक्तीने पाणी चोरीच्या उद्देशाने फोडला असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भीमा-पाटस कारखान्याचे माजी संचालक संपत आटोळे व ग्रामस्थांनी केली आहे.
रविवारी (दि. 5) मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने बंधाऱ्यात साचलेले पाणी मिळावे, या उद्देशाने हा बंधारा फोडला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाकडून 2012-13 मध्ये 15 लाख रुपये खर्च करून हा बंधारा बांधण्यात आला होता.
बंधारा फोडल्याने त्यात पुरेसा पाणी साठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून तो एक मीटरने वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनामध्ये केली आहे.
या निवेदनावर भाऊसाहेब आटोळे, दत्तू रांधवण, सोमनाथ आटोळे, अक्षय रांधवण, बाळू आटोळे, शिरीष आटोळे, किरण रांधवण, विजय आटोळे यांच्या सह्या असून या निवेदनाची प्रत छोटे पाटबंधारे विभाग पुणे, आमदार दौंड, रावणगाव पाटबंधारे शाखा, दौंड तहसीलदार, दौंड पोलीस, ग्रामपंचायत नंदादेवी यांना देण्यात आलेली आहे.