पारनेर-पिंपळगाव जोगा धरणातून पारनेर तालुक्यातील गावांसाठी आवर्तन सोडण्याबाबत पुणे येथील कुकडी सिंचन कार्यालयात 9 एप्रिलला बैठक होणार आहे. याच दिवशी आवर्तन सोडले जाईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.
पिंपळगाव जोगा धरणातून पारनेर तालुक्यातील कळस. पाडळी, आळे, अळकुटी, शेरी कासारी, रांधा. पाबळ. लोणी मावळा, देवीभोयरे, वडझिरे या गावांना आवर्तनातून पाणी मिळाले नाही. दीड महिन्यानंतर आवर्तन न सोडल्याने पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या गावातील शेतकर्यांनी या संबंधीची कैफियत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या पुढे मांडली. आमदार लंके यांनी शुक्रवारी ( दि.2 एप्रिल) वाडेगव्हाण येथील कुकडीच्या कार्यालयात कुकडीच्या वरिष्ठ अधिकारांसोबत तातडीने बैठक लावली.
पारनेर तालुक्यातील गावांना आवर्तनातून पाणी तातडीने द्यावी, अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. त्या नुसार पुणे येथील कुकडी सिंचन कार्यालयात 9 एप्रिल रोजी या संबंधीची अधिकृत बैठक होणार आहे. 9 एप्रिलला संध्याकाळी पारनेर तालुक्यातील गावांना पिंपळगाव जोगा धरणातून देण्यात येणार असल्याचे आश्वासन जलसंपदामंत्री पाटील यांनी लंके यांना दिले आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी महत्त्वपूर्ण समजणार्या पिंपळगाव जोगा धरणातून हक्काचे आवर्तन मिळणार असल्याने पिकांस फळबागांना जीवनदान मिळणार असल्याने शेतकर्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
आमदार लंके यांच्या समवेत कुकडी सिंचन शाखेचे अधीक्षक अभियंता एच. टी. धुमाळ, नारायणगाव कुकडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, कुकडी श्रीगोंद्याचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, उपअभियंता सुहास साळवे यांच्या सह शेतकरीसह आवर्तना संदर्भात बैठक घेण्यात आली.
यावेळी बाबा भंडारी, उपसरपंच संतोष काटे, महेश शिरोळे, बाळासाहेब पुंडे, बाळासाहेब म्हस्कुले, किरण डेरे, डॉ सुभाष मावळे, विलास शेंडेकर, संदेश कापसे, सतीश डेरे, विजय थोरात चंद्रकांत डेरे, राजू येवले, संतोष शेंडकर, किशोर यादव, जालिंदर शेळके, अशोक शेळके, अमोल यादव यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणीप्रश्नी इतरांची ढवळाढवळ नको ः लंके
पारनेर तालुक्याच्या पाणीप्रश्न सोडविण्यास आम्ही समर्थ आहे. पाणीप्रश्नी इतर कुणाची ढवळाढवळ आम्हाला नको आहे. कोणात्याही बाहेरच्या नेत्यांची गरज नसल्याची टीका आमदार लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत केली आहे. पाणी प्रश्नावरून आता राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे.