हवेलीच्या बीडीओंचे ग्रामपंचायती, पोलिसांना आदेश ः पुण्यातील पायपीट थांबणार
थेऊर (पुणे)- करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर ग्रामस्तरावर हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत अंत्यसंस्कार करण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. यामुळे नातलगांना पुणे येथील स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. यापुढील काळात ग्रामपातळीवरच करोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी कमिटी कार्यरत करून गावातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे आदेश पंचायत समिती हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनास दिले आहेत.
सद्यस्थितीत हवेली तालुक्यात करोनाबाधितची संख्या झपाट्याने वाढत आहे व त्यामुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध आहे; परंतु ग्रामस्तरावर अशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने व ग्रामीण भागातील लोकांमध्ये या आजाराबाबत भीती असल्याने अंत्यसंस्कार करण्यास अडचणी निर्माण होतात. या करीता ग्रामपातळीवर करोनाबाधित रुग्पांच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गाव कामगार तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य सेवक व पोलीस यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हवेली तालुक्यातील हवेली, लोणी काळभोर, देहुरोड, उत्तमनगर, सिंहगड, राजगड, भारती विद्यापीठ, लोणीकंद, हडपसर या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व ग्रामपंचायतींना कळविण्यास आले आहे.
- यांच्यावर ही जबाबदारी
सरपंच, पोलीस पाटील अंत्यविधीसाठी स्थळ निश्चिती करणे, नातेवाईक व नागरिकांमध्ये समन्वय साधणे. ग्रामसेवक, तलाठी यांनी वाहन व स्ट्रेचर सुविधा, झिपर शव बॅग, कापड, सॅनिटायझर, पीपीई किट, जळाऊ लाकडे व इतर अंत्यविधी साहित्य खरेदी. आरोग्य सेवक यांनी सॅनिटायझेशन व फवारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन करून, मृत्यू कारणाच्या निदानासाठी प्रयोगशालेय अहवाल मिळवणे तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे बीट हवालदार यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हाताळणे अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- करोनाग्रस्त मृत व्यक्तीच्या शवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्या गावात स्मशानभूमीमध्ये एकपेक्षा जास्त शवदाहिनी उपलब्ध असतील त्याठिकाणी 1 शवदाहिनी राखीव ठेवावी. एकच शवदाहिनी असेल त्या ठिकाणाबाबत अथवा अंत्यसंस्काराच्या ठिकाणाबाबत कमिटीने निर्णय घ्यावा. या सर्वांनी नियम पाळून आरोग्यविषयक योग्य काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत शव नातेवाइकांच्या ताब्यात देऊ नये. याबाबीसाठी येणारा खर्च संबंधित ग्रामपंचायतीने आवश्यकतेप्रमाणे ग्रामनिधीतून आपत्कालीन बाब म्हणून खर्च करावा.
-डॉ. सचिन खरात, तालुका आरोग्य अधिकारी