नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. दोन वर्षांनंतर शाळा सुरू होत असल्याने मुलांच्या पालकांनी शालेय साहित्याची जोरदार खरेदी केली. गणवेश, वह्या आणि अन्य आवश्यक साहित्य खरेदी केले. मात्र, साहित्य खरेदी करताना त्यांच्या किंमतीकडे फारसे लक्ष दिले नाही. प्रत्यक्षात यंदा शालेय साहित्याच्या भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसले. गणवेशाचे भाव तर तब्बल 25 टक्क्यांनी वाढले होते. या माध्यमातून कंपन्या आणि किरकोळ दुकानदारांनी जोरदार कमाई केली तर दुसरीकडे सर्वसामान्यांना चांगलाच झटका बसला.
शालेय साहत्याची खरेदी करण्यासाठी शहरातील दुकानांत गर्दी झाली होती. शाळा सुरू होणार म्हटल्यानंतर गणवेशही नवीनच पाहिजे. त्यामुळे पालकांनी गणवेश खरेदी केले. यावेळी गणवेशाच्या किंमती मात्र वाढल्या होत्या. गणवेशाच्या किंमतीत 20 ते 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाची किंमत 400 रुपये होती. यंदा किंमतीत वाढ झाल्याचे कापड विक्रेत्यांनीच सांगितले. करोनाच्या दोन वर्षांनंतर शाळा सुरू होणार होत्या. त्यामुळेे या दोन वर्षातील नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने कंपन्यांनी भाव वाढ केली. या भाववाढीचा स्थानिक बाजारपेठेवरही परिणाम दिसून आला. येथील दुकानात गणवेशाच्या दरात 20 ते 25 टक्के दरात वाढ झाल्याचे दिसून आले.
ठराविक दुकानातूनच गणवेश घ्या..
शाळा सुरू होण्याच्या आधी विद्यार्थ्यांनी कोणत्या दुकानातून गणवेश घ्यायचे याच्या सूचना शाळांनी पालकांना दिल्या होत्या. त्यानुसार पालकांनी संबंधित दुकानातून गणवेश खरेदी केले. दुसर्या दुकानात गेेले तर त्या शाळेचे गणवेश मिळत नव्हते.
मग 300 रुपयांत गणवेश कसा मिळणार ?
यंदा गणवेशाच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र, सर्व शिक्षा अभियानांतर्गत एका गणवेशासाठी 300 रुपये देण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र, गणवेशाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे व्यवस्थापन समितीने कशा पद्धतीने नियोजन करून गणवेश खरेदी केले, या प्रश्नाचे उत्तर अजून तरी मिळालेले नाही.