मुंबई – विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 10 जागांसाठीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला असून उद्या, सोमवारी मतदान आणि निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहे. बहुजन विकास आघाडी, एमआयएम आणि समाजवादी पक्षासह अपक्षांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे आघाडी बाजी मारते की भाजप राज्यसभा निवडणूकीची पुनरावृत्ती करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत एकही मत फुटू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. भाजपचे आमदार ताज प्रेसिडन्सी, कॉंग्रेसचे आमदार वरळीच्या फोर सिझन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार ट्रायडंट आणि शिवसेना आमदार वेस्टिन हॉंटेलमध्ये मुक्कामाला आहेत. या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने चुरस प्रचंड वाढली आहे.
आमदार आणि अपक्षांचे संख्याबळ लक्षात घेता भाजपला पाचवा उमेदवार, तर कॉंग्रेसला दुसऱ्या जागेवरचा उमेदवार निवडणून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेना आमदार आणि अपक्ष मिळून शिवसेनेकडे 62 मते आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि अपक्षाची चार मते मिळून राष्ट्रवादीची स्वतःची 55 मते आहेत. कॉंग्रेसची स्वतःची 44 मते आहे. त्यांच्याकडे अपक्ष आमदार नाहीत. दोन जागा निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसला अतिरिक्त मतांची गरज आहे. तर भाजपला पाचवी जागा निवडून आणण्यासाठी 130 मते आवश्यक आहेत.
शिवसेनेकडील अतिरीक्त मते कॉंग्रेसकडे वळवून घेण्याचा कॉंग्रेस नेत्यांचा प्रयत्न यशस्वी ठरल्यास कॉंग्रेसची दुसरी जागा सेफ होईल. तसेच, राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते कॉंग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय समाजवादी पक्षच्या आमदारांसोबत कॉंग्रेसच्या आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. कॉंग्रेसकडून भाई जगतापांनी बहुजन विकास आघाडीचे पक्षप्रमुख हितेंद्र ठाकुरांची भेट घेतली आहे. बविआ कोणाला मतदान करेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.