नवी दिल्ली – नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय पक्ष आधीच विरोध करत आहेत. संसद भवनाचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं अशी मागणी देखील यापूर्वी विरोधकांनी केली होती. आता या उदघाटनावर काही विरोधी पक्ष बहिष्कार टाकणार आहेत.
अशात संसद भवनाच्या उद्घाटनावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संसदेच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया दिली आहे. नव्या संसदेचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान करणार नाहीत तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान करतील काय?, असा प्रश्न आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विचारला आहे.
प्रमोद कृष्णम म्हणाले की, ‘आम्हाला पंतप्रधान मोदींना विरोध करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही तो करत आहोत. विरोधकांनी मोदींना विरोध करावा पण देशाला विरोध करणे योग्य नाही. संपूर्ण विरोधी पक्षाने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा कारण या नवीन संसद भवनात विरोधी पक्षाचे खासदार जाणार नाहीत का? ते म्हणाले की, पंडित नेहरूंपासून आजपर्यंत देशाच्या सर्व पंतप्रधानांनी मला आश्चर्य वाटते की, देशाच्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले नाही तर कोण करणार? असा प्रश्न आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विचारला आहे.