अजय माळवे
फलटण – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा येथील पालखीतळ असलेल्या 200 एकराच्या विस्तीर्ण अशा विमानतळावर दोन दिवसांच्या मुक्कामासाठी स्थिरावला आहे. संपूर्ण फलटण शहर भक्तीरसात न्हाऊन निघाले असून “माऊलीं’च्या दर्शनासाठी पालखी तळावर अलोट गर्दी उसळली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सर्वच ठिकाणी भजन, कीर्तनाचे स्वर कानावर ऐकू येत आहेत. पालखी सोहळा फलटण विमानतळावर स्थिरावल्यानंतर समाजआरती झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हरिपाठ, आरती, पूजा करण्यात आली.
श्री संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा 140 किलोमीटर अंतर पार करुन ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला असून आज विमानतळ येथील पालखी तळावर माउलींचे दर्शन घेण्यासाठी शहर व परिसरातील भाविक भक्त, स्त्री, पुरुष, आबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती. विमानतळ येथे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी माउलींचा सोहळा काल सायंकाळी विसावल्यानंतर दर्शनबारी सुरु झाली. त्यानंतर सर्वांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पालखीतळावर लांबच लांब रांगा दर्शन घेण्यासाठी लागलेल्या होत्या. स्त्री व पुरुष भाविक रांगेतून दर्शन घेऊन तृप्त मनाने बाहेर पडत होते. त्यानंतर माउलींचे दोन्ही अश्वांचे व रथाचे दर्शन भाविक घेत होते.
सोहळ्याच्या वास्तव्यादरम्यान विमानतळावर जिकडे तिकडे भगव्या पताका, टाळ मृदंगाचा निनाद व हरिनामाचा गजर, दिंड्यादिंड्यांमधूून घुमत असल्याने फलटण नगरीत हरिनामाचा जागर सुरु असल्याने भक्तीमय वातावरण झाले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान असंख्य दिंडीतील प्रमुख, वारकरी, भक्त, भाविक सकाळपासूनच अभंगात रंगलेले दिसत होते. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सुग्रास भोजन करताना वारकरी महिलाही हरिनामाचा गजर करीत होत्या. त्यामुळे फलटण नगरीत भक्तीचा सागरच अवतरल्याचा प्रत्यय येत आहे.