मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच विरोधकांकडून मंदिरे उघडण्याची मागणी केली जात आहे. मंदिरे खुली करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची त्यांना काही हौस नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, करोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. त्यामुळे विचार करूनच पावले उचलावी लागतील. विरोधासाठी विरोध नको. संभाजीनगरचे खासदार रस्त्यावर उतरल्यावर तिथे सर्व फज्जा उडालेला दिसतो आहे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकार करोनाला देवाची करणी मानत नाही.
ठाकरे सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करु नये असं घटनेत लिहिलं आहे का? तुमच्या लोकांनाच ठेवून काम करावे अशी अपेक्षा आहे का? केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर बदल्या झाल्या नाही का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित करत बदल्या राज्याच्या हितासाठीच असल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री गेले की गर्दी होते. पंतप्रधान हा प्रोटोकाॅल तोडत नाहीत. मुख्यमंत्री काम कुठून काम करत आहेत त्यापेक्षा काम करतायंत हे महत्त्वाचं आहे. फडणवीस ते फिरतायत त्यांचा फिडबॅक घेणार, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.