बारामती -रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतींना सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी कराव्यात व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,
असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे केले. बारामतीत करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले की, खतांच्या वाढलेल्या किंमतींना सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्राने खतांच्या किंमती कमी करण्यासाठी पावले उचलावीत. केंद्राने किंमती वाढविलेल्या असल्याने शेतकऱ्यांना त्यांनी खते पुरवावीत.
स्फुरद व पालांशाच्या किंमती वाढलेल्या असल्या तरीही शेतकऱ्यांनी युरियाकडे वळू नये. राज्याच्या काही भागात चक्रीवादळासह अतिवृष्टीचा इशारा मिळालेला आहे.
प्रशासनस्तरावर जी खबरदारी घ्यायची आहे, त्या संदर्भातील सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. नुकसान होऊ नये तसेच मनुष्यहानी होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.