वाई (प्रतिनिधी) – धोम धरणाच्या भिंतीसह पाटबंधारे विभागाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची गेली कित्येक वर्षे डागडुजी न झाल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. दोन्ही कालवे शेवटच्या घटका मोजत आहेत.
दरवर्षी कालवे वारंवार फुटून हजारो क्युसेस पाणी वाया जात असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. तीच अवस्था कालव्यावरील पुलांची आहे. पाया निखळल्याने काही पूल कोसळले आहेत, तर काही पूल कोसळण्याच्या मार्गावर आहेत; परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे धोम पाटबंधारे विभागाला त्याचे गांभीर्य नाही.
धोम धरण 1968 ते 77 या दरम्यान बांधले गेल्यानंतर शेतीच्या पाण्यासाठी डावा व उजवा असे दोन कालवे बांधण्यात आले. डाव्या कालव्याची लांबी 113 किमी असून पाणी वाहून नेण्याची क्षमता 21.20 घनमीटर आहे. या कालव्यामुळे 38 हजार 439 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. उजव्या कालव्याची लांबी 58 किमी व जलवहन क्षमता 5.81 घनमीटर आहे. यामुळे दहा हजार 460 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
सातारा, कोरेगाव ते सांगलीपर्यंत बळीराजा आपल्या शेतीला या कालव्यांचे पाणी देतो. हे दोन्ही कालवे आता शेवटच्या घटका मोजत आहेत. धरण बांधल्यावर 40 ते 45 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन्ही कालव्यांची आजतागायत डागडुजी झालेली नाही. धोम पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी बेसुमार गळती लागून कालवे डबघाईला आले आहेत. धरणातून विसर्ग केल्यावर हजारो क्युसेस पाणी ओढ्या-नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी लवकर कमी होऊन शेतकऱ्यांचे व पर्यायाने शासनाचे मोठे नुकसान होत आहे.
कालव्यांप्रमाणेच त्यावर वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या पुलांची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. सलग चाळीस वर्षे कालव्यांमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे पायाचे दगड निखळल्याने बहुतांश पूल कोसळण्याच्या मार्गावर आहेत. काही पूल यापूर्वीच पडले आहेत. या पुलांचा वापर त्या त्या भागातील शेतकरी शेतात जाण्यासाठी करतात.
हे पूल पडल्यास तेथील शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार आहे. वाई एमआयडीसीला जोडणारा डाव्या कालव्यावरील पूल पडल्याने नागरिक व कामगारांची कित्येक महिने गैरसोय झाली होती. मेणवली येथील पूल एक वर्षापूर्वी पडल्याने तेथील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. शेतात जाणे-येणे धोक्याचे झाले आहे.
या बाबींचा विचार करता पाटबंधारे विभागाने दोन्ही कालव्यांची व त्यावरील पुलांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे.