औषध फवारणीसाठी गावागावात चढाओढ
दौंड-दौंड शहरासह तालुक्यात गावागावात करोनाच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक औषध फवारणी करण्यात माननीयांची चमकोगिरीसाठी चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या देशावर करोनाचे मोठे संकट उभे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र माननीयांच्या चमकोगिरीमुळे याला कुठे तरी खीळ बसताना दिसत आहे.
राज्य प्रशासनाने नगरपालिका हद्दीत नगरपालिकेला व ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतींना सोडियम क्लोराइड जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार दौंड नगरपालिकेने दौंड शहरातील सार्वजनिक ठिकाणी या जंतुनाशक औषधाची फवारणी सुरू आहे. यामध्ये आजपर्यंत 11 प्रभागांमध्ये फवारणी पूर्ण झाली असून राहिलेल्ये एका प्रभागातही फवारणी करण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिकेने फायर फायटर व ट्रॅक्टरचा वापर केला असल्याचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी सांगितले.
शहरात सुरू असणाऱ्या फवारणीच्या कामात शहरातील माननीयांचा मोठा हस्तक्षेप पाहायला मिळत आहे. फवारणी सुरू असताना कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करून देण्याऐवजी स्वतः किती जागरूक आहे, हे दाखवण्यासाठी हे माननीय ट्रॅक्टरवर बसून व फायर फायटरचे पाईप हातात घेऊन फोटोसेशन करून सध्या सोशल मीडियावर सोडत आहेत. यातून ते नागरिकांना आम्ही किती जागरूक आहोत किंवा तुमच्यासाठी आम्ही काय करत आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींनीही आपापल्या गावात सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार दौंड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने सध्या फवारणी केली आहे. काही ग्रामपंचायतींचा फवारणीचा दुसरा व काही ग्रामपंचायतींचा तिसरा राऊंड सध्या सुरू असल्याचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी सांगितले. मात्र ग्रामीण भागातही ग्रामीण मधील माननीय चमकोगिरी करताना सोशल मीडियावर दिसत आहेत. स्वतः औषध फवारणीच्या ट्रॅक्टरवर बसणे त्याचा व्हिडिओ बनवणे, फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणे असे प्रकार केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर असो किंवा ग्रामीण भाग सध्या या माननीयांची चमकोगिरी सुरू असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे.
- माननीयांना कधी समजणार-
जगभरात करोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यातील मोठे नेतेही आपल्या घरात बसून आपल्या परीने या करोनाच्या संकटाशी मुकाबला करत आहेत. तसेच नागरिकांना आरोग्याबाबत काळजी घेण्याबाबत जनजागृती करत आहेत. मात्र हे गावागावात चमकोगिरी करणाऱ्या माननीयांना कधी समजणार हाच खरा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.