– भाजपच्या चारशे प्लसच्या दाव्याची उडवली खिल्ली
Lok Sabha Election 2024 | इंडिया आघाडी म्हणजे फिल्टर्ड कॉफी असून ती आता चांगली तयार झाली आहे. कॉंंग्रेसला मोडीत काढता येणार नाही, या पक्षाला पुनरागमन करण्याचा इतिहास असून कॉंग्रेस आता त्यादृष्टीने तयार होत आहे अशी प्रतिक्रीया तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी देशभरात यात्रा काढून राहुल गांधी यांनी क्रांतीकारी पाऊल उचलले असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी गेमचेंजर बनतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, शत्रुघ्न सिन्हा यांनी इलेक्ट्रोरल बाँडला भाजपचा “सर्वात मोठा घोटाळा आणि खंडणी रॅकेट” असे संबोधले . सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणूक प्रचारात भाजपच्या या खंडणीखोरच्या राजकारणाचा पर्दाफाश करण्याची विरोधकांना चांगली संधी आहे असे त्यांनी नमूद केले.
या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल असा दावा करून ते म्हणाले की, जर एनडीएला सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्सचा पाठिंबा असेल तर इंडिया आघाडीला जनतेचा पाठिंबा आहे. अनेकांना वाटते की इंडीया आघाडीला सक्षम भागीदार नाहीत, पण वस्तुस्थिती अशी आहे की त्यांच्या मागे भक्कम समर्थन आहे. देशाच्या विविध भागांमध्ये विरोधी आघाडी वेग घेत आहे, असे ते म्हणाले.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, आरजेडीचे तेजस्वी यादव आणि इतर अनेकजण ठामपणे इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे असल्याने इंडिया आघाडीची ही “फिल्टर कॉफी” चांगली जमून आली आहे असे ते म्हणाले. देशभरातील अनेक महत्त्वाचे नेते इंडिटा आघाडीचा भाग आहेत आणि म्हणूनच मी याला फिल्टर केलेली कॉफी म्हणतो. निवडणुकीनंतर इतर विरोधी नेतेही त्यात सामील होतील तेव्हा या फिल्टर केलेल्या कॉफीची चव अधिक चांगली होईल,असे ते म्हणाले.