आळंदी -संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 11 जून रोजी आषाढी वारीसाठी तीर्थक्षेत्र आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानच्या तयारीला वेग आला आहे. दरम्यान, माऊलींच्या चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीचा यंदाचा मान आळंदीतील भोसले घराण्याला मिळाला आहे. याबाबतची माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली आहे.
बैलजोडी समितीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी समितीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, रमेश कुऱ्हाडे, रामचंद्र भोसले, ज्ञानोबा वहिले आदी सदस्य उपस्थित होते. आळंदीतील प्रगतशील शेतकरी तुळशीराम नारायण भोसले व रोहीत चंद्रकांत भोसले यांना बैलजोडी जुंपण्याचा मान देण्याचा निर्णय बैठकीत झाला. तुळशीराम भोसले यांना बैलजोडीचा मान मिळाल्याने देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी शाल श्रीफळ देवून त्यांचा सन्मान केला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, पांडुरंग भोसले, संतोष भोसले, गोपीनाथ भोसले, रोहित भोसले, विठ्ठल घुंडरे, कुंडलिक कुऱ्हाडे, संजय भोसले, तन्मय भोसले, निखील भोसले, रुद्र भोसले, गणेश भोसले, भगवानराव काटे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुऱ्हाडे, घुंडरे, भोसले, वरखडे, वहीले, रानवडे कुटुंबालाच मिळतो, आळंदीसोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून सुरू आहे, असे बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी सांगितले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथाला बैलजोडीचा मान मिळाल्याने भोसले कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.