पुणे – महाराष्ट्रात रुसलेल्या मान्सूनचा राज्याच्या अंतर्गत भागावर विपरीत परिणाम होत आहे. राज्यातील किमान 14 जिल्हे पावसाच्या कमतरतेचा सामना करत आहेत. यात जालना, सातारा आणि सांगली हे राज्यातील सर्वांत संवेदनशील जिल्हे आहेत. या ठिकाणी पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार, मराठवाड्यात पावसाची कमतरता असलेले सर्वाधिक सात जिल्हे आहेत, मध्य महाराष्ट्रात चार आणि विदर्भात तीन जिल्हे आहेत ज्यात पावसाची कमतरता आहे. तर राज्यातील इतर जिल्हे हे “सामान्य’ पर्जन्यमान श्रेणीत आहेत.
या 14 पैकी जालना जिल्ह्यात सर्वाधिक 46 टक्के पावसाची कमतरता जाणवत आहे, जिल्ह्यात एकूण 408.3 मिमी पावसाच्या तुलनेत 291.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांगली जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची कमतरता 44% आहे, तर साताऱ्यात तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक 36% पावसाची कमतरता आहे, इतर जिल्ह्यांमध्ये 6% ते 25% पर्जन्यमान कमी आहे. महाराष्ट्रातील पावसाची स्थिती चिंताजनक आहे.
कारण, अनेक जिल्हे सामान्य पावसाच्या श्रेणीत आहेत. त्यांच्यापैकी काहींमध्ये असलेली कमतरता गंभीर आहे, अशी माहिती हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली. महाराष्ट्रात सध्या कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तीन जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस
राज्यात नांदेड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस झाला आहे. आकडेवारीनुसार नांदेडमध्ये 28, तर पालघर आणि ठाणे येथे अनुक्रमे 23 आणि 26 टक्के जास्त पाऊस झाला आहे. जुलैमध्ये सक्रिय मान्सूनच्या स्थितीमुळे ही स्थिती होती. पालघर आणि ठाण्याला मान्सूनच्या अरबी समुद्रातील पट्ट्याचा फायदा झाला, तर बंगालच्या उपसागराच्या पट्ट्याचा नांदेड जिल्ह्यावर परिणाम झाला. परिणामी, या जिल्ह्यांमध्ये सक्रिय मान्सूनच्या परिस्थितीत मध्यम ते मुसळधार पाऊस पडला.
कोकण आणि गोव्यात सरासरीपेक्षा जास्त
जुलैमध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर, कोकण आणि गोवा उपविभागाने गेल्या महिन्याभरात अतिरिक्त श्रेणीचा पाऊस अनुभवला जो 25 टक्क्यांपेक्षा जास्त होता. मात्र, राज्यात दीर्घकाळ मान्सूनच्या अनुपस्थितीमुळे कोकण आणि गोवा उपविभागातील एकूण पावसावरही परिणाम झाला आहे. हा प्रदेश पुन्हा पावसाच्या सामान्य श्रेणीमध्ये येतो आणि पावसाची टक्केवारी नऊ टक्के जास्त पाऊस म्हणून नोंदवली जाते.