नागपूर – ठाकरे गटाचे नेते आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी जल संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. बाळापूर व अकोला तालुक्यातील खारपाणपट्यातील 69 गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सरकारने स्थगिती दिली आहे. त्याविरोधात ही यात्रा काढण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हे आंदोलन करणार होते. मात्र त्याआधी नितीन देशमुख यांना अडवून ताब्यात घेतले. पोलिस आता देशमुखांना घेऊन अकोल्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. या संघर्ष यात्रेला नागपूरच्या सीमेवर धामना येथे अडवण्यात आले होते.
अकोल्यातून 10 एप्रिल रोजी या यात्रेला प्रारंभ झाला होता. याप्रकरणी देशमुख म्हणाले की, “पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे. प, काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही.”
250 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर ही यात्रा उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर पोहचणार होती. मात्र त्याआधी कायदा सुव्यवस्थेप्रकरणी पोलिसांनी नितीन देशमुख यांच्यासह 500 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या
आमदार नितीन देशमुखना अटक झाली.नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले.
खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले.आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या.महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली
सरकार जनतेलाच घाबरु लागले!— Sanjay Raut (@rautsanjay61) April 20, 2023
काय म्हणाले संजय राऊत ?
“पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना अटक झाली आहे. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटक केले. महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली आहे. सरकार जनतेलाच घाबरत आहे,” असे संजय राऊतांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.