मुंबई – महाराष्ट्रात नवीन करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे. यावरून करोना संसर्ग रोखण्यासाठी भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रभावी उपाय सांगितला आहे. लाॅकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अॅंड ट्रीट’ हाच करोना रोखण्याचा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.
“चाचण्या वाढवा, तोच करोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या महाविकास आघाडी शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी करोनाच्या दुसऱ्या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली. गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सत्र कायम ठेवा. येणाऱ्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लाॅकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अॅंड ट्रीट’ हाच करोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत.
असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा!
येणार्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!
(2/2)— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 27, 2021
दरम्यान, काल (ता.26) दिवसभरात महाराष्ट्रात 36 हजार 902 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 17 हजार 19 रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 112 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्रीच्या जमावबंदीची घोषणा केली आहे. हे जमावबंदी आदेश रविवारी (ता.28 मार्च) पासून लागू असणार आहेत.