पुणे – ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने वडगाव बुद्रूकच्या नवले पुलानजीक हायवेवर भीषण अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने भाजीपाला घेऊन निघालेला माल ट्रक सकाळी नवले पुल व वडगांव पुल येथील हॉटेल विश्वास समोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
अनियंत्रीत वाहनाने 4 चारचाकी वाहने आणि 4 रिक्षांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे मुंबई सातारा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.