पुणे –राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यात कोणतीही अडचण नाही. उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी काही ठिकाणी आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दहावी-बारावीचे निकाल वेळेत जूनमध्ये जाहीर होतील, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने झाली. दहावी परीक्षेसाठी सुमारे 16 आणि बारावीच्या 15 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यामुळे आता निकाल कधी जाहीर होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र राज्य शिक्षण मंडळाने वेळेत निकाल जाहीर होतील, असा दावा केला आहे.
दरम्यान, विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निकालास विलंब होणार असल्याची शक्यता होती. मात्र, उत्तरपत्रिका तपासणीच्या कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नसून, पेपर तपासणीची प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. यंदाचा बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.