कोलकाता – पश्चिम बंगाल सरकारने 6 जुलै ते 19 जुलै या अवधीत सहा प्रमुख शहरांतून कोलकात्यात येणाऱ्या विमानांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, नागपूर आणि चेन्नाई ही ती सहा शहरे आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या सूचनेनुसार नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने त्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
इंदोर आणि सूरतमधून कोलकात्यात येणारीही विमाने बंद ठेवण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती. तसेच पश्चिम बंगालमधील बागडोगरा आणि अंदल विमानतळांवरील विमान सेवाही बंद करण्याची शिफारस राज्य सरकारने केली आहे पण त्यावर अजून निर्णय झालेला नाही. पश्चिम बंगालमध्ये बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमुळेच मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार होत असल्याचे त्या सरकारच्या सूत्रांचे म्हणणे असून त्यांनी विमानांबरोबरच काही रेल्वे गाड्यांनाही बंदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.