मुंबई –आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणात बंदी घालण्यात आलेल्या अंकित चव्हाण याने बीसीसीआय व मुंबई क्रिकेट संघटनेला ही बंदी उठवण्याची विनंती केली आहे.
2013 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत चव्हाण, अजित चंदेला व एस. श्रीशांत यांनी स्पॉटफिक्सिंग केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर तहहयात बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या तीनही खेळाडूंना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देताना 2015 साली क्लीन चिट दिली होती.
श्रीशांतवर घालण्यात आलेली बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर बीसीसीआयने त्याला स्थानिक क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली होती. श्रीशांतने आपली बाजू न्यायालयात योग्य पद्धतीने मांडल्यामुळे त्याला दिलासा मिळाला आहे. मात्र, माझ्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कारकिर्दीचा विचार करून बीसीसीआय व मुंबई संघटनेने माझ्यावरील बंदीही मागे घ्यावी, अशी मागणी वजा विनंती चव्हाणने केली आहे. संघटनेने चव्हाणने केलेल्या विनंतीला दुजोरा दिला असून आगामी बैठकीत यावर विचार केला जाइल, असेही स्पष्ट केले आहे.