मंचर (पुणे)- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (दि. 5) शिक्षक दिन “काळा दिवस’ म्हणून राज्यातील 40 हजार शिक्षक काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करणार आहेत, तर राज्यातील सर्व तहसील व सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 4) निवेदन देऊन निदर्शेने करतील, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे व सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांनी दिली आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना महासंघाने वेळोवेळी विविध प्रलंबित मागण्यांचे पत्र देऊन चर्चेसाठी विंनती केली होती. दि. 26 ऑगस्ट रोजीच्या पत्रान्वये दोन दिवसात बैठकीचे आमंत्रण न दिल्यास महासंघ आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही कनिष्ठ महाविघालयीन शिक्षकाच्या समस्यांबाबत राज्य महासंघाला न बोलवता बैठक घेण्यात आली.
दरम्यान, महासंघाच्या निवेदनानंतर मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासंबंधी दि. 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले; परंतु यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याने शिक्षक काळ्याफिती लावून काम करतील तसेच आंदोलनामुळे होणाऱ्या हानीची जबाबदारी शासनाची असेल, असे महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. लक्ष्मण रोडे यांनी सांगितले.
शिक्षणमंत्र्यांकडून शिक्षकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
शिक्षणमंत्री राज्य महासंघाशी चर्चा न करता एक-एक मागणीसाठी निर्माण झालेल्या नवीन संघटना व गटांशी शिक्षणमंत्री चर्चा करून महासंघाला डावलत आहे. समस्यांचे निराकरण न करता बुद्धीभेद करीत असून शिक्षकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. शिक्षक वर्गात या कृत्याबद्दल प्रचंड नाराजी असून कल्पना देऊनही महासंघाच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे राज्य महासंघाला आंदोलन करण्यास शिक्षणमत्र्यांनी भाग पाडले असल्याचा आरोप महासंघाने करून याचा निषेध केला आहे.