क्वन्सलॅंड – भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघातील पहिल्याच प्रकाशझोतातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी संततधार पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात 1 बाद 132 धावा केल्या होत्या. स्टार फलंदाज स्मृती मानधनाने नाबाद 80 धावांची खेळी करत पहिल्याच दिवसरात्र कसोटीत अर्धशतक साकार करणारी पहिलीच भारतीय फलंदाज बनण्याचा विक्रम केला.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. या निर्णयाचा पुरेपूर लाभ घेत मानधना व शेफाली वर्मा यांनी अत्यंत थाटात सुरुवात केली. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजांवर वर्चस्व राखताना संघाला 93 धावांची सलामी दिली. सोफी मोलीन्युक्सने शेफालीला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. शेफालीने 4 चौकारांसह 31 धावांची खेळी केली. त्यानंतर मानधनाने पूनम राऊतच्या साथीत संघाला शतकी मजल मारून दिली.
दरम्यान, मानधनाने आपले अर्धशतक पूर्ण करताना शतकाकडे कूच केली. मात्र, त्याचवेळी संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पंचांनी वारंवार पाहणी केल्यावर तसेच पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. भारताचा महिला संघ इतिहासात प्रथमच दिवसरात्र कसोटी सामना खेळत असून, गुलाबी चेंडूवर भारतीय फलंदाज मानधनाने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले. तिने आपल्या नाबाद 80 धावांच्या खेळीत 144 चोंडूत 15 चौकार व 1 षटकार अशी आतषबाजी केली. पहिल्या दिवशी केवळ 44.1 षटकांचाच खेळ होऊ शकला.
संक्षिप्त धावफलक – भारतीय महिला संघ पहिला डाव – 44.1 षटकांत 1 बाद 132 धावा. (शेफाली वर्मा 31, स्मृती मानधना खेळत आहे 80, पूनम राऊत खेळत आहे 16, सोफी मोलीन्युक्स 1-18).