सातारा -जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, वाई, पाटण, सातारा, कराड या तालुक्यांतील 12 गावे, 17 वाड्यावस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. फलटण, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यात अद्याप एकही टॅंकर सुरू नसल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी दिली.
करोनाचे संकट उभे ठाकले असताना आता काही तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ही समस्या कमी आहे. जिल्हा परिषद प्रशासन मात्र सतर्क झाले आहे. पाणीपुरवठा विभागाने आवश्यक उपायोजना आखल्या आहेत. माण तालुक्यात दोन टॅंकरने वारुगड व लगतच्या पाच वाड्या, बिजवडी गावठाण अशी दोन गावे व पाच वाड्यांमधील 1975 लोकांना पाणीपुरवठा होत आहे. खटाव तालुक्यात गारवडी व आवळे पठार याठिकाणी 149 लोकांना एका टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. कोरेगाव तालुक्यात भंडारमाची व भाटमवाडी या दोन गावात टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यावर 1385 ग्रामस्थ आणि 1087 पशुधन अवलंबून आहे.
वाई तालुक्यात मांढरदेव, बालेघर, बोपर्डी, धनगरवाडी, गडगेवाडी या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा होत असून 2787 ग्रामस्थ आणि 1276 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी, अंब्रूळकरवाडी (भोसगाव), चव्हाणवाडी (नाणेगाव), शिद्रुकवाडी, शिद्रुकवाडी (वरची) या गावातील 2716 ग्रामस्थ आणि 1399 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे.
सातारा तालुक्यात आवाडवाडी व लगतच्या तीन वाड्याना टॅंकरने पाणीपुरवठा होत असून 1388 ग्रामस्थ आणि 85 पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. कराड तालुक्यात मस्करवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा होत असून 551 ग्रामस्थ आणि 760 पशूधन या पाण्यावर अवलंबून आहे. फलटण, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यांत अद्याप पाणी टॅंकरची मागणी नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी दिली.
टंचाई आराखड्यातील कामांना मंजुरी
जिल्ह्यात वार्षिक कृती आराखड्यानुसार विंधन विहिरी, कूपनलिकांची 123 कामांपैकी 119 कामे पूर्ण आहेत. नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची 117 कामे होती. त्यातील एक काम अपूर्ण आहे.तात्पुरता पूरक नळ योजनांची सर्वच्या सर्व 11 कामे पूर्ण आहेत. विहिरी खोल करणे, गाळ काढण्याची सर्व 21 कामे पूर्ण आहेत.
2019- 20 या वर्षी टंचाई आराखड्यातील नऊ विंधन विहिरी, नळ पाणी विशेष दुरुस्तीची 54, तात्पुरता पूरक नळ योजना चार, विहिरी खोल करणे, गाळ काढणे अशा सहा कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करत आहे. एकही गाव,वाडी वस्ती पाण्यापासून वंचित राहणार नाही, असे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी सांगितले.