पाटण -मे महिना मध्यावर असतानाही कोयना धरणात अद्याप 42.78 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीजनिर्मिती अखंडित सुरु असून राज्यावर भारनियमनाचा भार पडणार नाही. पावसाला सुरुवात होईपर्यंत शेतीसह पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण भासणार नसल्याने करोना महामारीच्या काळातही दिलासादायक बाब आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात गतवर्षी जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडला. कोयना धरणाच्या पाणी साठ्यात ऐतिहासिक आवक झाली. जुलै ते सप्टेंबरअखेर एक दोन नव्हेतर तीनवेळा कोयना धरण ओव्हर फ्लो झाले. धरणातील पाणी नियंत्रणासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 16 फुटांपर्यंत उचलण्यात आले. तर धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज या पर्जन्यमापन केंद्रावर 10 हजार मिमी. पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत शिवसागरात 235.42 टीएमसी इतक्या पाण्याची आवक झाली.
धरणातून 127.48 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कोयना धरणाच्या पाण्यापासून सुमारे 2 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील 67 टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. दि. 1 जून 2019 ते 10 मे 2020 अखेर पोफळी टप्पा 1 व 2 मधून वीज निर्मितीसाठी 30.91 टीएमसी तर 4 था टप्प्यातून 31.14 टीएमसी असे 62.05 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मिती केला गेला आहे. सिंचनासाठी राखीव असलेल्या 30 टीएमसी पाण्यापैकी 21.44 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे.
कृष्णा पाणीवाटप लवादानुसार 1 जून ते 31 मे हा एक वर्षाचा कालावधी तांत्रिक पाणी करार आहे. यंदाच्या तांत्रिक करारापैकी 11 महिन्यांचा कार्यकाळ संपला आहे. या करारातील फक्त 20 दिवसांचा कालावधी असतानाही धरणात 42.78 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदाच्या तीव्र उन्हाळ्यातील सिंचन व वीजेची गरज भागवून आगामी नवीन तांत्रिक वर्षासाठी आवश्यक पाणीसाठा शिल्लक राहील, अशी स्थिती असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थान विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
लवादाचा तांत्रिक काळ यशस्वी