वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 मधील रखडलेली 32 (1) ची प्रक्रिया पूर्ण करा अथवा भूसंपादन रद्द करुन 7/12 वरील शिक्के काढा तसेच चार वर्षांची शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने आंबी येथील चौकात अडीच तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कुठलाही ठोस निर्णय न घेता स्थगित करण्यात आले.
या आंदोलनाला एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित नसल्याने त्याचा निषेध करुन येत्या पंधरा दिवसांत 32 (1) बाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष शातांराम कदम यांनी दिला.
या आंदोलनात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, मावळ पंचायत समितीच्या सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती निकीता घोटकुले, कृति समितीचे अध्यक्ष शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, निवृत्ती शेटे, रवींद्र भेगडे, संदीप काकडे, शिवाजी पवार, सुनील भोंगाडे, मोहन घोलप, दत्तात्रय पडवळ, गणेश भांगरे, भिकाजी भागवत, संतोष जाचक, मधुकर धामणकर, पंढरीनाथ पिंगळे, दिगंबर आगीवले, रामदास चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.
सन 2017 मध्ये निगडे, आंबळे, कल्हाट व पवळेवाडी या गावांमध्ये एमआयडीसी टप्पा 4 जाहीर झाला. त्यानंतर संबंधित चारही गावांच्या सात-बारा उताऱ्यांवर संपादनाचे शिक्के पडले. सन 2018 मध्ये दरही निश्चित केला परंतु दर निश्चित होऊनही 32 (1) प्रकिया पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. तसेच यापुढे मात्र काहीच कार्यवाही झाली नाही याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
या वेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना समितीच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले.
काय आहे 32 (1) प्रक्रिया
तळेगाव एमआयडीसी टप्पा क्र. 4 मध्ये निगडे, आंबळे, कदमवाडी, शेटेवाडी, मंगरूळ, कल्हाट, पवळेवाडी या भागातील 5500 एकर पेक्षा अधिक क्षेत्रावरील 32 (1) ची प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. त्यानुसार शासनाने 32 (1) च्या प्रक्रिया करण्यास मान्यता दिली. शासनाच्या या निर्णयामुळे आता “एमआयडीसी’तील शेतकऱ्यांची जमीन शासनाच्या मालकीची झाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला; मात्र गेल्या काही महिन्यांपासून 32 (1) ची प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.