लंडन – इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मंगळवारी येथे दाखल झाला आहे. लॉर्डस या एतिहासिक मैदानावर म्हणजेच क्रिकेटच्या पंढरीत हा सामना येत्या गुरुवारपासून सुरु होणार आहे. येथे दाखल झाल्यावर लगेचच संघाने सराव सत्रातही सहभाग घेतला.
या दोन संघातील पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता व सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे या मैदानावर होत असलेल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे.
यजमान इंग्लंडच्या तुलनेत भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. पण पावसाने भारताचा संभाव्य विजय हिरावून घेतला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्डसच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी लंडनला दाखल झाल्यावर भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने इन्स्टाग्रामवर सर्व खेळाडूंचा फोटो पोस्ट केला आहे.
दरम्यान, भारतीय संघातील सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील सर्व खेळाडू लॉर्डसवरील कसोटी सामन्यासाठी लंडनमध्ये दाखल झाले असले तरीही श्रीलंकेतून थेट लंडनला दाखल झालेले सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे अद्याप विलगीकरणातच आहेत. त्यांना 13 तारखेपर्यंत विलगीकरणातच राहावे लागणार असल्याने या कसोटीत त्यांना खेळता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गांगुलीला विलगीकरण बंधनकारकच
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी लॉर्डसवर उपस्थित राहणार असले तरीही करोनाच्या धोक्यामुळे त्यांनाही येथील विलगीकरण कालावधी बंधनकारक असल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.