अकोले -करोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगाव स्थापन करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा समितीमधील तलाठी, ग्रामसेवक हे सदस्य अनुपस्थित राहात आहेत. ते गैरहजर राहात असल्याने सरपंच व पोलीस पाटील यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवकांना नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत व ग्रामसुरक्षा समितीला सुरक्षा किट देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सेवा संघाने केली आहे.
संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोंदके, सरचिटणीस प्रदीप हासे, महिला तालुकाध्यक्षा भारती नवले यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देऊन वरील मागणी केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. पुणे, मुंबई व अन्य ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी व करोनाच्या संदर्भात गावपातळीवर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.
त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, अशा चार सदस्यांचा समावेश आहे. मात्र अकोले तालुक्यातील अनेक गावांत तलाठी व ग्रामसेवक हजर राहात नसल्याने सरपंच व पोलीस पाटील यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी भागात कुमशेतच्या सरपंचास तर मारहाण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ व संगमनेर शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अकोले संगमनेर, सिन्नर या तिन्ही तालुक्यांतील व्यापारी, छोटे मोठे व्यावसायीक, शेतकरी, नोकरदार आदींची ये-जा असते. या तालुक्यातील नागरिक एकमेकांशी नेहमी संपर्कात असतात. अनेक जण लॉक डाऊन असतानाही नियमाचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
अकोले शहर व तालुका अद्याप करोनापासून बचावला आहे. मात्र भविष्यकाळात काही दुदैवी घटना घडू नये, यासाठी गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा समित्या सक्षम करणे अधिक गरजेचे आहे, असे स्पष्ट करून गावात बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन केल्यावर त्यांच्या देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी ही जिल्हा परिषद व माध्यमिक शिक्षकांवर सोपविण्यात यावी व ग्रामसुरक्षा समितीला संरक्षण किट पुरवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोंदके, सरचिटणीस प्रदीप हासे, रुंभोडीचे उपसरपंच बाळासाहेब मालुंजकर, भंडारदराचे सरपंच पांडुरंग खाडे, उपसरपंच गणपत खाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनाही देण्यात आली आहे.