पुणे – राज्य शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी संवर्गातील ४ हजार ६४४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यातील ३६ जिल्हा केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी २६ जून ते १७ जुलै या कालावधीत अर्ज करता येणार आहे. तलाठी भरती प्रक्रिया राबवण्याची राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यानुसार जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी तलाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली.
एकूण दोनशे गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची वयोमर्यादा मोजण्यासाठी १७ जुलै २०२३ हा दिनांक असेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. अधिसूचनेमध्ये नमूद संवर्गात काही मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. मात्र अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, परीक्षेचा अंतिम निकाल लागेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रात नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग, समांतर आरक्षणासाठी पदे उपलब्ध होण्याची, सध्याच्या पदसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची घोषणा संकेतस्थळाद्वारे केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.