नांदेडच्या तरुणाने लिहिले अजय देवगणला पत्र,’जंगली रम्मी ऑनलाईन गेमची जाहिरात करता मग, हा गेम खेळून तुम्ही किती पैसे जिंकले ?’

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने रम्मी ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. या जाहिरातीवरून आता अजय देवगणचे फॅन्स त्याच्यावर नाराज झाल्याचे दिसून येत आहे. जंगली रम्मी ऑनलाईन गेम खेळून तुम्ही आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे असा थेट सवालच एका फॅन्सने पत्रक लिहून केला आहे. पत्र लिहिणारा तरुण नांदेडचा असून या तरुणाचे नाव विलास वसंत राव शिंदे आहे.
या पत्रात त्याने लिहिले आहे की,’आपण ज्या जंगली रम्मी ऑनलाईन गेमची जाहिरात करता तेच जंगली रम्मी ऑनलाईन गेम खेळून तुम्ही आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. व जाहीरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील नवतरुण व कर्जबाजारी तरुणांना आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा असले बाबत.
महोदय अभिनेता अजय देवगन स. नमस्कार व राम राम आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची व तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खुप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्यांने सोशल मीडियावर केले पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहीरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जनु सवयच लागली. व याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत? त्यामुळे अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे.’
त्याने पुढे लिहिले आहे की,’जाहीरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितले पाहिजे व नवतरुणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हे सर्व आपण सांगितले पाहिजे. जर ह्याच गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिंदास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायदयाचा आहे. हे पण आपण सांगितले पाहिजे. आणी हाच गेम तुमच्या आजुबाचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण पाहीले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरूणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही असे जाहीराती करुन नवतरुणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितले पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे. या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा व आपण ही जाहीरात बंद करावी व नवतरुणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावे ही विनंती’ असं म्हणत शिंदे याने अजय देवगणने केलेल्या जाहिरातींवरून टीका केली आहे.






