पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बाजार आवारात नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचला, असे पत्रक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी काढले आहे. सभापती दिलीप काळभोर यांच्या मान्यतेने हे पत्रक काढले आहे. फळे-भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे, गस्ती विभागप्रमुख आणि सर्व गटप्रमुख यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी.
ती न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पत्रकात म्हटले आहे.
कर्नाटक हापूससाठी आंबा शेड उभारण्यात आले आहे. येथे दररोज होणारी आवक, लिलाव होऊन मिळालेला दर व दैनंदिन बाजार फी याबाबत दररोज कळविण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरीच्या नावावर कर्नाटक हापूसची विक्री होत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हे पत्रक काढण्यात आले आहे. नियम भंग करणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नका, असेही पत्रकात म्हटले आहे.
यांच्यावर करा कारवाई
गाळ्यासमोर १५ फुटांबाहेर शेतीमाल लावणे
इतर राज्यांतील आंब्याची रत्नागिरी, देवगडच्या नावावर विक्री करणे
अनधिकृत विक्रेते
कांदा- बटाटा विभागात दुबार विक्री
गाळ्यांवर दोनपेक्षा जास्त मदतनीस आढळल्यास
एक लाख दंड वसूल
आंबा हंगाम सुरू आहे. हंगाम सुरू झाल्यापासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत १ लाख ४६ हजार ८२२ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई करण्यात येईल, असे बाजार समितीचे फळ आणि भाजीपाला विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी सांगितले.