पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्यावाढीसाठी “स्वाध्याय’ उपक्रम सुरु केला आहे. याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या या उपक्रमाचा शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 3 नोव्हेंबर रोजी झाला. विद्यार्थ्यांना घरच्या घरी फोनवर बहुपर्यायी प्रश्न उपलब्ध करून ते सोडविण्यासाठी देण्यात आले होते.
यातून स्वयंमूल्यमापन व आपली कामगिरी लक्षात येते. यातून उपलब्ध होणाऱ्या माहितीतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर समजणार आहे. त्यानुसार सुधारणा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.
“स्वाध्याय’ उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. उपक्रमास सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. 5 लाख 6 हजार 678 विद्यार्थी प्रवेशित असून त्यातील 1 लाख 24 हजार 599 जणांनी सहभाग घेतला.
24.59 टक्के विद्यार्थी समाविष्ट झाले होते. इतर सर्वच जिल्ह्यांतून 1.5 टक्क्यांपेक्षाही कमी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुणे जिल्ह्यात 20 लाख 1 हजार 323 विद्यार्थी प्रवेशित आहेत. यातील केवळ 12 हजार 610 जणांनी उपक्रमात भाग घेतला. 0.63 टक्के एवढेच हे प्रमाण होते.